Catharsis Poetry Collection
esakal
मोतीराम राठोड - sakal.avtaran@gmail.com
लेखक किंवा कवी लिहितो म्हणजे आपले अनुभव, आपले निरीक्षण आणि त्यातून होणाऱ्या विकासाची दखल तो आपल्या लिखाणात घेतो. आपल्या आजूबाजूच्या बदलाची टिपणे म्हणजेच लेखकाचे लेखन असते. या लेखनातून लेखकाच्या जगण्याच्या व जाणिवांच्या कक्षा रुंदावत जातात. पुढे त्यात सतत वाढ होत जाते. ही त्यांच्यासाठी एक सुखद आणि आनंददायी बाब असते. लेखकाची लिहिण्याची एक विशिष्ट भूमिका असते. लेखनातून लेखक आपली ओळख तयार करतो; पण तसे करणे ही तशी अवघड गोष्ट; पण तेवढीच त्यांच्यासाठी आनंददायी आहे.
कवयित्री सारिका उबाळे आपल्या ‘कॅथार्सिस’ कवितासंग्रहातून स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरल्या आहेत. या संग्रहाच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्राच्या साहित्यविश्वात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. ‘कॅथार्सिस’ हा कवितासंग्रह काव्यलेखनाच्या प्रांतात नवी उमेद जागविणारा ठरतो. ‘कॅथार्सिस’ हा शब्द ॲरिस्टॉटलच्या साहित्यविचाराचा अभ्यास करताना विशेषत्वाने समोर येतो. ‘कॅथार्सिस’ म्हणजे भावनांचा उद्बोधक निचरा! ‘कथार्सिस’ म्हणजे मनातील वेदना, ताण, आनंद, मनात दडपलेले भाव यांना अभिव्यक्त करून आत्मशांती मिळवणे आणि हेच या संग्रहातील कवितांचे केंद्रस्थान आहे. संवेदनशील मनाच्या तळाशी दडलेली शोकात्मताही या संकल्पनेतून सूचित होते.