School Memories
esakal
किशोर बळी
आदरणीय गुरुजी,
साष्टांग नमस्कार...
शाळा सोडून आज कितीतरी वर्षं उलटून गेलीत; परंतु मनात आजही आठवणींची शाळा भरत असते. केवळ व्यवहाराची भाषा करणाऱ्या दुनियादारीत मन रमत नाही आणि त्या आठवणींच्या प्रदेशातून मात्र परत यावंसं वाटत नाही. शाळेतील वर्गखोल्या, समोरचं मैदान, तिथली झाडं-वेली, रंगमंच, मित्र-मैत्रिणी, शिक्षकवृंद हे सगळं जग टवटवीतपणे मनाच्या पडद्यावर उमटत राहतं. आज सगळं असूनही काहीतरी हरवल्याची जाणीव मनात सलत राहते आणि गरिबीतले ते दिवसच खऱ्या अर्थाने श्रीमंत होते, हे उमगायला लागतं. माणसांच्या गर्दीत माणूसपणच हरवत चाललेलं असताना साने गुरुजींच्या शब्दात प्रेमाचा धर्म समजावून सांगणारी शाळा खूप आठवते. कधी कधी मन फार उदासवाणं होऊन जातं. अगदी कशाकशातच रमत नाही. बाहेर कोलाहल, मनात शांतता... बाहेर गर्दी, आत एकटेपणा... बाहेर चोहीकडे लख्ख प्रकाश आणि आतून मात्र अंधारून आलेलं असतं. अशा वेळी गुरुजी तुमची खूप आठवण येते.