

Battle of Khalad-Belsar 1648
esakal
अनिकेत यादव - इतिहास अभ्यासक
शाहजीराजांचा स्नेही रनदौलाखान १६४३-४४मध्ये वारला आणि त्यांचा वैरी असणाऱ्या मुस्तफाखानाचा आदिलशाही दरबारात प्रभाव वाढला. अखेर विविध कारणांचे निमित्त होऊन २५ जुलै १६४८ रोजी शाहजीराजांना कैद केले. त्यानंतर मुस्तफाखानाने बंगलोर येथील शाहजीराजांचे थोरले पुत्र संभाजीराजांविरुद्ध तानाजी दुरे, विठ्ठल गोपाळ व फर्हादखान यांची रवानगी केली. तर कऱ्हाड प्रांतावर खैरियतखानास धाडले. आणि ऑगस्ट १६४८मध्ये आदिलशाहाने शिवाजीराजांविरुद्ध खुदावंतखान उर्फ फतहखानास रवाना केले.
मागे एका लढाईत फतह (विजय) मिळविली म्हणून यास ‘फतहखान’ हा किताब देऊन आदिलशाहने गौरविले होते. लष्करी मोहिमांच्या विजयाचा अनुभव गाठीशी असणाऱ्या या फतहखानाला ५ ते ६ हजार सैन्यासह मिनाद शेख, रतन शेख, दुसरा एक फतहखान, अश्रफशाह, मुसेखान, मताजी घाटगे, फलटणचा बजाजी निंबाळकर, बाळाजी हैबतराव हे सरदार सोबत दिले होते. ज्याअर्थी एवढ्या सरदारांची फौज याच्या नेतृत्वात दिली गेली, त्याअर्थी फतहखान आदिलशाहीतील मातब्बर सरदार असावा. शिवाजीराजांच्या तयारीची काहीच कल्पना नसल्याने, फार प्रतिकार होणार नाही, नुसत्या दटावणीनेच काम भागेल असा आदिलशाहाचा कयास होता.