

Shivaji Maharaj Konkan Campaign
esakal
अनिकेत यादव - इतिहास अभ्यासक
आग्र्याहून परतल्यानंतर एप्रिल १६६७मध्ये राजांनी दक्षिण कोकणावर धडक मारली आणि कुडाळ, पेडणे, भतग्राम, सत्तरी, फोंडे इत्यादी प्रदेश आपल्या वर्चस्वाखाली आणला. तेथील आदिलशाही सैन्य व कोकणातील देसाई यांना हुसकावल्यानंतर त्यांना सहकार्य करणाऱ्या पोर्तुगीजांवर राजांनी आपली नजर वळविली. यातूनच १६६७ आणि १६७० असे दोन पोर्तुगीजांसोबतचे ऐतिहासिक तह आकारास आले.
पोर्तुगीज संबंधाची पार्श्वभूमी ः भारतात सर्वप्रथम पाऊल ठेवणारे (मे १४९८) आणि सर्वांत शेवटी जाणारे (डिसेंबर १९६१) युरोपियन व्यापारी म्हणजे ‘पोर्तुगीज’. अशी ४६३ वर्षांची त्यांची भारतातील प्रदिर्घ कारकीर्द. व्यापारवृद्धी, राज्यविस्तार आणि धर्मप्रसार या ३ प्रमुख उद्दिष्टांसाठी पोर्तुगीजांनी जगभर आपले साम्राज्य वाढविले. १५१० पासून गोवे बेट ही त्यांच्या पौर्वात्य साम्राज्याची राजधानी बनली. भारताच्या संपूर्ण समुद्रकिनारपट्टीलगत त्यांच्या ५० हून अधिक वसाहती/लष्करी ठाणी होत्या. भारताच्या समुद्रावर प्रभुत्व असल्यामुळे पोर्तुगालचा राजा स्वतःला ‘हिंदी महासागराचा सम्राट’ म्हणवून घेत असे. पोर्तुगीजांचे परवाने (कार्ताझ्) असल्याशिवाय कोणालाही हिंदी महासागरात संचार करता येत नसे.
निजामशाहीत असल्यापासून (साधारण १६३४ पासून) शाहजीराजांचे पोर्तुगीजांशी मैत्रीचे संबंध होते. शाहजीराजांनी १२ ऑगस्ट १६५४ रोजी गोव्यावर स्वारी केली. नोव्हेंबर १६५७मध्ये शिवाजीराजांनी पोर्तुगीजांच्या कोरलई जवळचे (वरचे) चौल जिंकले आणि तेव्हापासून त्यांच्या राजकीय संबंधांची सुरुवात झाली. काही पोर्तुगीज कारागीर मदतीला घेऊन राजांनी आपल्या नौकाबांधणीची सुरुवात केली. त्यानंतर समुद्री व्यापाराचे महत्त्व लक्षात घेऊन राजांनी बंदरे, समुद्री किल्ले व सागरी व्यापार याकडे देखील लक्ष दिले. शिवाजीराजांनी जेव्हा जेव्हा (१६६३ व १६६४) दक्षिण कोकणावर आपला अंमल प्रस्थापित केला, तेव्हा तेव्हा वाडीचे सावंत तसेच पेडणे व कुडाळ येथील देसाई हे पोर्तुगीजांच्या आश्रयास गोव्याला जात. आणि संधी मिळताच शिवाजीराजांच्या प्रदेशावर छापे घालत. त्यामुळे या दोन सत्तांमध्ये केव्हा ना केव्हा भडका उडणारच होता.