

Shivaji Maharaj Surat Campaign
esakal
अनिकेत यादव - इतिहास अभ्यासक
मुघलांनी १६६१ ते १६६३ या काळात स्वराज्याची प्रचंड लूट करून नुकसान केले होते. त्याची भरपाई औरंगजेबाच्या शहरांकडून होणे अपेक्षित होते. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत शहराची निवड केली. मुघली सैन्याला गाफील ठेवून महाराजांनी या शहरावर हल्ला केला. या शहरातून भरपाई घेण्यासाठी केलेली ही मोहीम यशस्वी करूनच महाराज परतले.
मुघलांनी १६६१ ते १६६३ यादरम्यान स्वराज्यात धुमाकूळ घालून मोठे आर्थिक नुकसान केले होते. त्याच्या नुकसान भरपाईसाठी, स्वराज्याच्या पुनर्निर्माणासाठी व राज्याच्या संरक्षणासाठी प्रचंड धनाची आवश्यकता होती, जी मुघलांकडूनच वसूल करणे आवश्यक होते. म्हणूनच बादशहाच्या तुऱ्यातील एक मौल्यवान पिसं उपटून काढण्यासाठी राजांनी सुरत स्वारीची योजना आखली आणि अचूक नियोजनाद्वारे ती यशस्वीही केली.
‘सुरत’ हे त्या वेळचे संपूर्ण भारतातील सर्वांत मोठे व्यापारी केंद्र होते. तापी नदीच्या दक्षिण तीरावर वसलेले हे शहर, नदी समुद्राला जेथे मिळते त्या ‘सुवाली’ (स्वाली) बंदरापासून आतमध्ये सु. २० कि.मी. अंतरावर होते. पश्चिम किनारपट्टीवरील मुघलांच्या अधिपत्याखालील सुरत हे एकमेव महत्त्वाचे बंदर होते. अफाट संपत्तीचे आगर असलेल्या या शहरातून, केवळ जकातीच्या माध्यमातूनच बादशाही खजिन्यात दरवर्षी १२ लाख रुपये महसूल जमा होत असे. १ लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या या शहरात मुस्लिम, हिंदू, पारशी व्यापाऱ्यांबरोबरच इंग्रज, डच, पोर्तुगीज, तुर्क, आर्मेनियन, इराणी, अरब व ज्यू यांसारखे परदेशी व्यापारीही वास्तव्यास होते. वीरजी वोरा, हाजी झाहिद बेग व हाजी कासिम हे येथील अग्रगण्य व्यापाऱ्यांपैकी होते. यापैकी वीरजी वोरा हा जगातील सर्वांत श्रीमंत व्यापारी म्हणून ख्यातनाम होता आणि त्याची एकूण संपत्ती ८० लाख रुपये इतकी होती.
परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे, एवढ्या समृद्ध शहराच्या संरक्षणासाठी मुघलांनी कोणत्याही विशेष उपाययोजना केलेल्या नव्हत्या. शहराच्या आणि किल्ल्याच्या संरक्षणासाठी दोन स्वतंत्र सेनापती होते. तापी नदीच्या दक्षिण तीरावर असलेला सुरतचा किल्लाही फारसा मजबूत नव्हता; त्याच्या ३ बाजूंना खंदक तर एका बाजूला नदीचे संरक्षण होते. किल्ल्यातील मोजक्या सैन्याव्यतिरिक्त शहराचा संरक्षण अधिकारी इनायतखान याच्याकडे १ हजार घोडदळाची तुकडी तैनात होती. मात्र, त्याने आपल्याच सैनिकांच्या पगाराचे पैसे हडप करून लष्करी व्यवस्था कमकुवत करून ठेवली होती.