

Shivaji Maharaj Konkan campaign
esakal
अनिकेत यादव - इतिहास अभ्यासक
छत्रपती शिवाजी महाराजांनी १६६१मध्ये कोकणातील पालवणी, प्रभावळी इ. प्रांत जिंकला होता. दरम्यान, १६६१ ते १६६३ या काळात अजस्त्र मुघल सेना हरप्रकारे स्वराज्याची लचकेतोड करीत होती, त्यामुळे राजांना स्वराज्याबाहेर मोहिमा घेता आल्या नव्हत्या. शायिस्ताखानाला ५ एप्रिल १६६३ रोजी धडा शिकविल्यानंतर लगेचच, १३ एप्रिल रोजी राजांनी दक्षिण कोकणाकडे कूच केले.
कुडाळवर दुसरी स्वारी ः यापूर्वी १५ फेब्रुवारी १६६०च्या सुमारास शिवसैन्याने कुडाळ जिंकले होते. छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्यावर अडकल्याचे पाहून १८ मार्च १६६०च्या सुमारास लखम सावंतांनी पुन्हा कुडाळ बळकाविले. फेब्रुवारी ते जून १६६१मध्ये राजांनी दाभोळ, राजापूर, पालवणी, प्रभावळी इ. प्रांत घेतला होता, मात्र मुघलांशी सुरू असलेल्या संघर्षामुळे राजांना त्यावेळी लखम सावंतांचा बिमोड करता आला नव्हता. अखेर शायिस्ताखानाने स्वराज्यातून धूम ठोकल्यानंतर राजांनी आपले लक्ष कुडाळकडे वळविले. राजे १३ एप्रिल १६६३ रोजी राजगडाहून दक्षिण कोकणाच्या मोहिमेसाठी निघाले. ते १० हजार पायदळ व ४ हजार घोडदळासह १३ मे रोजी कुडाळमध्ये दाखल झाले. आणि त्यांनी दुसऱ्यांदा कुडाळ जिंकले व रावजी सोमनाथ यांची कुडाळचे सुभेदार म्हणून नेमणूक केली.
कुडाळ जिंकल्यानंतर शिवसैन्याने २२ जून १६६३च्या सुमारास वेंगुर्ला व बांदा येथपर्यंत मजल मारली. वेंगुर्ल्यास २००० सैन्य ठेवून ३० जून रोजी राजे कुडाळवरून प्रतापगड व नंतर राजगडावर परतले. (यावेळची कोकण मोहीम राजांनी लवकर आटोपती घेतली, कारण ३ वर्षे मुघलांनी स्वराज्याच्या केलेल्या नासधुसीची भरपाई म्हणून सुरत लुटीची आखणी या काळात राजांना करायची होती.)
राजे ६ डिसेंबर १६६३ रोजी राजे सुरतेकडे निघाले. ६ ते ८ जानेवारी या काळात भारतातील सर्वांत समृद्ध बंदर असलेल्या सुरत शहराची लूट केली. आणि ५ फेब्रुवारी १६६४ रोजी राजगडावर सुरक्षित परतले. (या मोहिमेची माहिती पुढील लेखात येईल)