

प्रा. डॉ. प्रकाश पवार - राज्यशास्त्र अधिविभागप्रमुख, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर
नवी शहरे विकसित करण्यातून राजकीय अर्थकारण आकाराला घेत असते. महाराष्ट्रात १९६०च्या दशकापासून त्याचा प्रत्यय आला आहे. आता तिसरी-चौथी मुंबई वसवण्याच्या घोषणा झाल्या असून, यातून मुंबई परिसराचा राजकीय पोतच बदलणार आहे.
राजकीय अर्थकारणाचे २१व्या शतकातील शहरीकरण हे एक खास वैशिष्ट्य आहे. नवीन शहर स्थापन करणे हा राजकीय अर्थकारणाच्या प्रक्रियेचा एक महत्त्वाचा भाग आहे. ही प्रक्रिया १९९०च्या दशकात सुरू झाली. त्यावेळी या प्रक्रियेचा सर्वांत जास्त प्रभाव चंद्राबाबू नायडू यांच्यावर पडला होता. अशीच दुसरी घटना म्हणजे नितीन गडकरी आणि बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबई-पुणे हा द्रुतगती मार्ग तयार करण्यामध्ये पुढाकार घेतला होता. या शहरी प्रक्रियेतून नितीन गडकरी यांचे नेतृत्व आणि व्यक्तिमत्त्व शहरी पद्धतीचे घडत गेले. बाळासाहेब ठाकरे हिंदुहृदयसम्राट झाले. या अस्मिता निर्मितीची प्रक्रियाही एका अर्थाने शहरीकरणातून घडली.