

BCCI power games
esakal
खेळ नियोजनाच्या राजकारणात सत्तांतर होत असताना मागील पदाधिकाऱ्याने आपल्या सत्तेचा वापर करून गैरकृत्य केल्याचा किंवा नियमात नको ते बदल केवळ आपली खुर्ची टिकवण्यासाठी आणि वैयक्तिक फायद्यासाठी केल्याचे आरोप सर्वांना माहीत आहेत. मग त्याच गैरकारभाराचा गाजावाजा करत नवीन सत्तेवर येणारा खेळनियोजक आपण पदाधिकारी बनल्यावर काही काळानंतर त्याच प्रकारची चूक करताना दिसतो, तेव्हा हसावे का रडावे कळत नाही. गेली कित्येक वर्ष भारतीय क्रिकेटचे वार्तांकन करत असताना असेच प्रकार वारंवार बघायला मिळाले आहेत. भल्या भल्या नामांकित लोकांनी क्रिकेटच्या भाषेत सांगायचे तर नो बॉल टाकल्याचे बघायला मिळाले. आपण करत असलेली कृती चूक आहे कळत असूनही रेटून गैरकारभार केला आहे. कोणी कोणी कसे कसे नो बॉल टाकले, याची थोडी उजळणी करतो आणि आज या विषयाला का हात घातला, हे शेवटी सांगतो.
जगमोहन दालमियांनी भारतीय क्रिकेटच्या अर्थकारणाला निर्णायक कलाटणी कशी दिली हे मी तुम्हाला गेल्या एका लेखात कौतुकाने सांगितले होते. ज्या दालमियांनी पहिल्यांदा इंग्लंड बाहेर एकदिवसीय विश्वचषक यशस्वीपणे भरवून दाखवला. ज्या दालमियांनी टीव्ही प्रक्षेपण हक्कांच्या रकमेत घसघशीत वाढ करून घेताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला अर्थकारणात मजबूत केले. ज्या दालमियांनी आयसीसीला सक्षम आणि सधन बनवले, त्याच दालमियांनी आपली बीसीसीआयवरची पकड आजन्म मजबूत राहावी म्हणून स्वत:करिता पेट्रन इन चीफ म्हणजेच मुख्य संरक्षक असे पद निर्माण करून ते बीसीसीआय कार्यकारिणीत मंजूर करून घेण्याचा प्रयत्न केला, हे विसरता येणार नाही.