

Smart Technology and Health
esakal
जुही चावला - juhichawlaoffic@gmail.com
तंत्रज्ञानाचा परिणाम केवळ मोबाईल टॉवरपुरता मर्यादित नाही. मोबाईलपासून स्मार्ट शहरांपर्यंत तंत्रज्ञानाने माणसाचे आयुष्य बदलले, जग जवळ आणले आणि अनेक अशक्य गोष्टी शक्य केल्या. मात्र, या वेगवान प्रगतीच्या प्रवासात आपण काही मूलभूत प्रश्न विचारणे विसरत आहोत का? सुविधा वाढत असताना आरोग्य, पर्यावरण आणि पुढच्या पिढीच्या सुरक्षिततेचा समतोल आपण राखत आहोत का, हा विचार करण्याची वेळ आली आहे.
आज प्रत्येक गोष्ट स्मार्ट झाली आहे - फोन स्मार्ट, घरे स्मार्ट, शाळा स्मार्ट, शहरे स्मार्ट... पण या सगळ्या स्मार्ट जगात एक साधा प्रश्न आपण स्वतःला विचारतो का? आपण खरेच पहिल्यासारखे निरोगी, शांत आणि सुरक्षित आहोत का?
टेक्नॉलॉजी अर्थात तंत्रज्ञानाने आपले जीवन सोपे केले, यात शंका नाही. दूर असलेली माणसे जवळ आली, माहिती चुटकीसरशी मिळू लागली, कामाचा वेग दुपटीने वाढला; पण या सोयींच्या मागे आपल्या हातातून नेमके काय सुटते आहे, याचा विचार करणेही तितकेच गरजेचे आहे. कारण प्रगती केवळ वेगात नसते; तर ती संतुलनात असते.