

युद्ध होतात, सैनिक लढतात आणि त्यातूनच वीरगाथा तयार होतात. हातात शस्त्र घेऊन मृत्यूला ललकारणारे सैनिक एक क्षणात घडत नाहीत. त्यामागे वर्षानुवर्षे एखाद्या देश, राज्य, प्रदेश यांची संपूर्ण युद्धव्यवस्था राबत असते. भारताचा सर्वात धुमसता कालखंड म्हणजे मध्ययुगीन कालखंड! त्या सतत युद्धग्रस्त परिस्थितीमध्ये सगळ्या राज्यांमध्ये योद्ध्ये घडवणाऱ्या व्यवस्थांचा कणा होता तो म्हणजे स्थानिक युद्धकलांचे आखाडे आणि आश्रम! त्या त्या प्रदेशातल्या तरुणांना शस्त्र प्रशिक्षण देणं, युद्धासाठी तयार करणं, युद्ध आणि शस्त्रसाक्षर बनवणं यांचं दायित्व युद्धकलेच्या आखाड्यांचं असायचं.
यातलीच एक शृंखला म्हणजे ‘थांग-ता’, ईशान्य भारतातल्या ‘मणिपूर’ राज्याची अनेक शतकांची परंपरा असलेली युद्धकला. या पारंपरिक शस्त्रप्रशिक्षणाने फक्त सैनिक निर्माण केले नाहीत, तर अत्यंत कठोर नैतिक, सामाजिक आणि अध्यात्मिक पाया असलेली परिपूर्ण युद्धकला निर्माण केली. थांग-ता युद्धकलेचे मूळ नाव ‘ह्युएन लालोंग’ म्हणजे ‘स्वसंरक्षणाची कला’, हिचा उगम प्राचीन ‘कांग्लेईपाक’ म्हणजे सध्याच्या मणिपूरमध्ये झाला असे मानले जाते. मणिपुरी भाषेमध्ये ‘थांग-ता’चा शब्दशः अर्थ होतो ‘तलवार आणि भाल्याची युद्धकला’. या युद्धकलेच्या नावातच त्याचे सार आहे. थांग-ता ही मणिपूरमधल्या मैतई/मिथी जमातीची पारंपरिक युद्धकला आहे.