

Nishant Kumar political entry
esakal
परिमल माया सुधाकर, सहयोगी प्राध्यापक, ‘एमआयटी’ स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणे
भविष्यात संयुक्त जनता दलाचे ‘एनडीए’मधील राजकीय स्थान नेहमीच दुय्यम असेल, अशी तजवीज भाजपला करायची आहे. निशांत कुमार यांना नितीश यांचे पक्षातील वारसदार करण्यात येत आहे, कारण ते नितीश यांचे बिहारच्या राजकारणातील वारसदार होणार नाहीत याची भाजपाला खात्री आहे.
बिहारचे मुख्यमंत्री व जनता दला संयुक्तचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीश कुमार यांचा राज्यसभेत जाण्याचा निर्णय आणि त्यांचे एकमेव पुत्र, निशांत कुमार यांचा पक्षात अधिकृत प्रवेश या दोन्ही घटना ना अनपेक्षित आहेत ना आश्चर्यकारक आहेत. २०२५मध्ये बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वीच नितीश कुमार यांच्या तब्येतीसंबंधीच्या चर्चांना पेव फुटला होता. निवडणूक प्रचारात राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून नितीश यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली नव्हती. त्यामुळे, निवडणुकीनंतर बहुमत मिळाल्यास नितीश यांच्याऐवजी भारतीय जनता पक्षाच्या नेत्याच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडण्याची शक्यता व्यक्त केल्या जात होत्या. त्याच सुमारास, पहिल्यांदा संयुक्त जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी निशांत कुमार यांच्या राजकारण प्रवेशाबाबत फलकबाजी केली होती. प्रत्यक्ष निवडणूक प्रचारात ‘एनडीए’च्या बाजूने बाजी पलटण्यामागील एक प्रमुख कारण नितीश यांना लाभलेली सहानुभूती होती. त्यांना मुख्यमंत्रिपदाचा अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केलेले नसतानाही, मतदारांनी ‘पच्चीस ते तीस (२०२५ ते २०३०) फिर से नीतिश’चा नारा बुलंद केला होता. मतदारांनी दिलेल्या निवडणूक कौलाविरुद्ध जात भाजपचा मुख्यमंत्री करणे ‘एनडीए’ला शक्य नव्हते, त्यामुळे नितीश कुमार यांनी पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. बिहारमध्ये लोकधारणा आहे की भाग्यवान काळ्या मांजरीला नऊ वेळा तोच जन्म प्राप्त होऊ शकतो. नितीश कुमार यांनी दहाव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत भाग्यावर मात करणारे आपले कर्तृत्व सिद्ध केले होते. तरी सुद्धा राजकीयदृष्ट्या नितीश फार काळ तग धरणार नाहीत हे स्पष्ट झाले होते.