

Artificial Intelligence Trends 2026
esakal
सम्राट फडणीस - samrat.phadnis@esakal.com
‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६’ या दिल्लीत भरलेल्या परिषदेने कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तिच्यावरील तांत्रिक मक्तेदारी भविष्यातील भू-राजकीय समीकरणे ठरवू शकते, हा संदेश ठामपणे दिला. लष्करी आणि आर्थिक शक्तीइतकीच ‘एआय’ची ताकद निर्णायक ठरू शकते, हे वास्तव समोर आले. भारताने पुढच्या पाच ते दहा वर्षांत गाठावयाचा पल्ला परिषदेतून दिसला.
नवी दिल्लीतील ‘भारत मंडपम’ने १६ ते २१ फेब्रुवारीदरम्यान ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६’साठी दररोज सकाळी उघडलेली प्रवेशद्वारे नव्या महत्त्वाकांक्षांची उसळी सामावून घेत होती. शेकडो चर्चासत्रे, प्रदर्शने, शंभराहून अधिक देशांचे प्रतिनिधी आणि वीसपेक्षा अधिक राष्ट्रप्रमुख यांच्या उपस्थितीत कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स - एआय) आपल्या अद्भुत क्षमतेचे दर्शन घडवत होती. त्याच वेळी, या अपार सामर्थ्यामुळे मानवी भवितव्याबाबत एक सूक्ष्म काळजीचा सूरही सभागृहात दाटून येत होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन, ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा अशा जागतिक नेत्यांसमोर ‘एआय’ क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्यांचे प्रमुख वर्तमान आणि भविष्याचा वेध घेत होते. ‘ओपनएआय’चे सॅम अल्टमन, ‘गुगल’चे सुंदर पिचाई, ‘अँथ्रोपिक’चे दारिओ आमोदेई आणि ‘गुगल डीपमाइंड’चे डेमिस हसाबिस यांच्या उपस्थितीमुळे परिषदेला ऐतिहासिक परिमाण लाभले.