

Indian Folk Culture Traditions
esakal
काळभैरवनाथ आणि जोगेश्वरी देवी यात्रेच्या निमित्ताने पुणे जिल्ह्यात असलेल्या जेऊरमध्ये ‘देवी-दानवा’च्या भेटीचे अनोखे सोंग निघते. या परंपरेतून देवी-दानवाच्या संघर्षापेक्षा समन्वयाची, एकजुटीची, बंधुभावाची शिकवण देण्याचा वारसा गाव शेकडो वर्षांपासून जपत आहे.
भारतीय लोकसंस्कृतीत चैत्राचा संपूर्ण महिना हा लोकउत्सवाचा महिना मानला जातो. चैत्राच्या पौर्णिमेपासून ते चैत्राच्या अमावस्येपर्यंत राज्यात असंख्य ठिकाणी देवी-महादेवांच्या यात्रा निघतात. याच चैत्राच्या अमावस्येला काळभैरवनाथ आणि जोगेश्वरी देवीची यात्रा भरते. यानिमित्ताने गावात ‘देवी-दानवा’च्या भेटीचे एक अनोखे सोंग पुणे जिल्ह्यात निराजवळ असलेल्या जेऊर या गावात निघते. त्याची ही परंपरा येथे यात्रेच्या निमित्ताने वर्षानुवर्षे सुरू आहे. तसे पाहिले तर देव-दानव संघर्षाच्या रंजक कथा व त्यांचे असंख्य दाखले प्राचीन भारतीय साहित्यात तसेच भारतीय लोकसाहित्य व लोकपरंपरांमध्ये पदोपदी आढळतात, दिसून येतात. देशाच्या कानाकोपऱ्यात या कथा समाजमनात खोलवर रुजल्याची असंख्य उदाहरणे यात्रेच्या माध्यमातून दिसून येतात.