

Anti-Caste Struggle India
esakal
१ जानेवारी १९९१... विसाव्या शतकातील शेवटच्या दशकाचा पहिलाच दिवस... मानवी हक्क अभियानासाठीचा तो महत्त्वाचा ठरला... तो उगवलाच नवी वेदना, नवा संघर्ष घेऊन... २१व्या शतकातलं पदार्पण होऊ घातलं असताना आपला समाज मात्र चौथ्या शतकातील जातीभेदामध्ये, विषमतेमध्ये नांदत होता... जेव्हा निसर्ग कूस पालटतो, तेव्हा तो कात टाकून नव्या बहराची चाहूल देतो, तसेच शतक कूस पालटताना नव्या संघर्षाची, परिवर्तनाची नांदी करीत असावं... सरणाऱ्या शतकाच्या आभाळात दाटलेला सारा अंधार दूर सारून नव्या शतकासाठी आकाशाचं निरभ्र प्रतल प्रस्तूत करीत असावं, असं मला वाटलं.
मराठवाड्याच्या लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ या गावात ३१ डिसेंबर १९९० रोजीच मी काही सहकाऱ्यांना घेऊन राहण्यासाठी गेलो होतो... गावगाड्यामधल्या अस्पृश्य ठरवल्या गेलेल्या महार आणि मांग (मातंग) यांच्या जातीवर आधारित अन्याय्य कामांच्या विरोधात आंदोलन उभं करायचा विचार मराठवाड्यातील काही संस्था-संघटनांसोबत झाला होता. त्याचा एक भाग म्हणून शिरूर अनंतपाळ गावात मी गेलो होतो. यानिमित्ताने मराठवाड्यामधल्या जालना आणि औरंगाबाद म्हणजे आताचं संभाजीनगर वगळता सर्व जिल्ह्यांमध्ये मी फिरलो होतो... समाज जवळून पाहत होतो. शोषणाला चेहरा नसतो... शोषकाला आणि शोषितालाही तो नसतो... शोषणाच्या मुळाशी हजारो वर्षांपासून आलेली अन्याय्य रूढींची कठोरता असते... ताठरपणा असतो... शोषण ही वृत्ती आहे, या शोषणाला कुणी विरोधच केला नाही, तर शोषणाची ही वृत्ती पिढ्यान्पिढ्या संक्रमित होत राहते... बळकट होत राहते. आम्ही आमच्या परीने त्याला संघटित विरोध करून थांबवण्याची धडपड करीत होतो... ‘मानवी हक्क अभियान’ हे याच धडपडीसाठीचं विविध संस्था-संघटनांचं व्यासपीठ होतं... महारांनी सोडलेली कामं मातंगांकडे आल्याचं त्यावेळेस माझ्या निदर्शनास आलं.