

India National Security
esakal
डॉ. रामानंद एन. गर्गे - ramanandgarge@gmail.com
भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रभावी आणि दूरगामी परिणाम करणारा निर्णय घेत, केंद्रीय गृह मंत्रालयाने दहशतवादाविरुद्धच्या आपल्या ‘झिरो टॉलरन्स पॉलिसी’अंतर्गत ‘प्रहार’ हे राष्ट्रीय दहशतवाद विरोधी धोरण जाहीर केले आहे. हे धोरण ‘संपूर्ण सरकार’ या संकल्पनेवर आधारित असून, दहशतवादाचा समूळ विनाश करण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा प्रशासकीय व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. ‘प्रहार’ धोरण व त्यातून भारताच्या सुरक्षेवर होणाऱ्या सकारात्मक परिणामांविषयी...
दहशतवादाचा सात दशकांहून अधिक काळाचा अनुभव घेतलेल्या भारताने प्रथमच नव्या रणनीती जाहीर करून जगातील दहशतवादासारख्या भीषण आणि जटिल समस्येविरोधात प्रगल्भ मानसिकतेचे दर्शन घडवले आहे. या धोरणाद्वारे पारंपरिक सुरक्षा आवाहनांव्यतिरिक्त एकविसाव्या शतकातील जलदपणे उद्भवणाऱ्या अपारंपरिक सुरक्षा आव्हानांना, जसे की दहशतवाद्यांद्वारे होणारा ड्रोन्सचा गैरवापर, क्रिप्टो वॉलेट्स, डार्क वेब आणि दहशतवादी भरती व निधीसाठी वापरले जाणारे एनक्रिप्टेड मेसेजिंग, प्रभावीपणे तोंड देण्यासाठी सुसज्जतेवर भर दिला आहे. या धोरणाद्वारे सर्वसामान्य जनतेबरोबर देशाच्या प्रमुख मूलभूत सुविधांच्या सुरक्षेला प्राधान्य देत दहशतवादाचा श्वास असलेल्या आर्थिक तसेच शस्त्रसामग्री, परियोजना साहाय्य (लॉजिस्टिकल सपोर्ट) यंत्रणा समूळ उद्ध्वस्त करण्याचा निर्णायक मनोदय अधोरेखित केला आहे.