

First Tribal Woman Leader Maya Ivnate in Rajya Sabha
esakal
नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत भाजपने नागपूरच्या माजी महापौर माया इवनाते यांना संधी दिली. महाराष्ट्राच्या संसदीय इतिहासात राज्यसभेवर जाणाऱ्या माया इवनाते या पहिल्या आदिवासी महिला नेत्या ठरल्या आहेत. नगरसेवक, महापौर, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या सदस्य आणि आता थेट संसदेचे वरिष्ठ सभागृह असा त्यांचा प्रवास आहे. ‘सरकारनामा’चे प्रतिनिधी डॉ. राजेश रामपूरकर यांनी त्यांच्याशी साधलेला संवाद...
तुमच्या महापौर पदाच्या कार्यकाळाची चर्चाही होते. त्यावेळी तुम्ही घेतलेल्या निर्णयांचाही उल्लेख होतो. महापौर किंवा कोणत्याही महत्त्वाच्या पदांवरून काम करतानाची तुमची भूमिका काय असते?
शहराचा विकास म्हणजे केवळ सिमेंट-काँक्रीटची जंगले उभी करणे नव्हे, तर समाजाच्या शेवटच्या रांगेतील माणसाला सन्मानाने जगण्यासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे होय. याच विचाराने मी माझ्या महापौरपदाच्या कार्यकाळात कामांना वेग दिला होता. माझ्यासमोर आव्हाने मोठी होती, पण लोकहिताचा संकल्प त्याहूनही दृढ होता. मी महापौर पदाची धुरा सांभाळली, तेव्हा नागपूर शहरासमोर पाणीटंचाई हा सर्वांत तीव्र प्रश्न होता. पाण्यासाठी वस्त्या-वस्त्यांवर रणकंदन माजत असे, रिकाम्या घागरी घेऊन महिलांचे मोर्चे दररोज महापालिकेवर धडकत होते. ही परिस्थिती केवळ तात्पुरती मलमपट्टी करून सुधारण्यासारखी नव्हती, तर त्याला कायमस्वरूपी तोडग्याची गरज होती. या प्रश्नाचे गांभीर्य ओळखून, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विशेष पुढाकारातून मी शहरासाठी २४ तास पाणीपुरवठा योजना मंजूर करून घेतली. या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे शहरातील पाणी वितरणात मोठी सुसूत्रता आली आणि पाण्यासाठी होणारा संघर्ष बऱ्याच अंशी निकाली निघाला.
भाजपने तुम्हाला राज्यसभेवर संधी दिली आहे. तुमचा राजकीय जीवनाचा प्रवास अतिशय तळागाळातून झाला. त्या प्रवासाविषयी काय सांगाल?
माझा राजकीय प्रवास अत्यंत तळागाळातून सुरू झाला आहे. नागपूर महापालिकेत नगरसेवक म्हणून मी सार्वजनिक जीवनाची सुरुवात केली. जनतेने मोठ्या विश्वासाने निवडून दिलेले असल्यामुळे, जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी पूर्ण झोकून देऊन काम करायचा मी निश्चय केला. नगरसेवक म्हणून जनतेच्या विश्वासाला सार्थ ठरायचे आणि सेवेचे व्रत कायम ठेवायचे होते. जनतेकडूनही माझ्या कामाला पोचपावती मिळत होती आणि पक्षाकडूनही त्याची दखल घेण्यात आली. पक्षाने मला महापौर म्हणून संधी दिली. या संधीचाही जनतेच्या सेवेसाठी सोने करायचे म्हणूनच मी काम केले. त्यावेळी केलेल्या कामाला जनता अजूनही विसरली नाही, हे पाहताना अभिमानच वाटतो. महापौर असताना नागपूरच्या प्रत्येक नागरिकाने मला जी मोलाची साथ दिली, तीच माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठी पुंजी आहे. त्याच प्रेमाच्या जोरावर मी राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाची सदस्य म्हणून दिल्लीत यशस्वी काम करू शकले. आज पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर जो विश्वास टाकला आहे, त्यामागे नागपूरकरांच्या शुभेच्छांची शिदोरी आहे.