

Indian Classical Music
esakal
सरोदचे जादूगार उस्ताद अमजद अली खाँ यांच्यासह त्यांचे सुपुत्र व नातवंडे, अशा तीन पिढ्यांचे एकत्रित सादरीकरण अनुभवण्याची संधी ‘सकाळ’तर्फे आयोजित ‘द सरोद क्विंटेट’ या मैफिलीतून रसिकांना मिळणार आहे. या मैफिलीच्या निमित्ताने उस्तादजींनी स्वरांचे महत्त्व, गुरू-शिष्य परंपरा, संगीताचे शिक्षण, कलाकारांची कर्तव्ये अशा विविध विषयांवर मनमोकळा
संवाद साधला. ‘सकाळ’च्या प्रतिनिधी महिमा ठोंबरे आणि गायिका-रचनाकार सायली पानसे-शेल्लीकरी यांनी घेतलेल्या उस्तादजींच्या मुलाखतीचा हा संपादित अंश.
आपल्या आयुष्यात स्वर किती महत्त्वाचे आहेत?
‘स्वर हेच ईश्वर’ असे आपल्या देशात म्हटले जाते. प्रत्येक माणसाने स्वरांशी नाते जोडण्याचा प्रयत्न करायला हवा. ‘एकतर स्वर समजून घ्या किंवा शब्द समजून घ्या’, असे आमचे वडील हाफीज अली खाँ साहेब सांगायचे. शब्दांची दुनिया चांगली आहे; पण फार गोंधळात टाकणारी आहे. शब्दांमुळे मतभेद होतात, वाद होतात; स्वर मात्र सगळ्यांना जोडतात, एकत्र आणतात. भारत-पाकिस्तानच्या फाळणीत जमिनीची फाळणी झाली; मात्र स्वरांची फाळणी नाही झाली! म्हणून स्वरसाधना महत्त्वाची आहे. आपल्या देशात शाळांची सुरुवात प्रार्थना सभेतल्या देशभक्तिपर गाणे आणि विविध श्लोकांनी होते. या गाण्यांमुळे विद्यार्थ्यांवर शब्दांचे, भाषेचे ओझे आपण नकळत लादतो. त्यामुळे खरेतर ही सुरुवात ‘सरगम’ने व्हायला हवी. शब्दांऐवजी मुलांना स्वरांच्या दुनियेची ओळख करून द्यायला हवी.