

West Bengal Politics
esakal
सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) छाप्यात नको ती कागदपत्रे अमित शहा यांच्या ताब्यात गेली असती, या भीतीने ममता बॅनर्जी यांनी कारवाईमध्ये घटनाबाह्य पद्धतीने हस्तक्षेप केला. आता ही लढाई तीव्र होणार. युद्धात आणि राजकारणात सारे काही क्षम्य असते, या तत्त्वाचा अवलंब करून ममता बॅनर्जी त्यांना लाभलेल्या शक्तींचा वापर करीत आहेत. त्याचे तीव्र पडसाद पश्चिम बंगालमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकरूपी युद्धात ‘शतप्रतिशत’ उमटणार यात शंकाच नाही. आता या ‘खेला होबे’चा पहिला डाव सुरू होतोय..
देशातील कुठल्याही राज्याच्या तुलनेत पश्चिम बंगालमध्ये सहजासहजी सत्तांतर घडत नाही. सत्ताप्राप्तीसाठी झुंजणाऱ्या पक्षाला दडपशाही झुगारून हिंसाचार आणि रस्त्यावरील संघर्षाला सामोरे जाणे अनिवार्य असते. स्वातंत्र्योत्तर काळातील ७९ वर्षांमध्ये केवळ तीन राजकीय पक्ष किंवा आघाड्यांनी पश्चिम बंगालवर सत्ता गाजवली आहे. काँग्रेसने पहिली तीस वर्षे, डाव्या आघाडीने त्यानंतरची विक्रमी ३४ वर्षे आणि तृणमूल काँग्रेसने गेली पंधरा वर्षे. स्वातंत्र्यानंतरच्या काळात सत्तेत आलेल्या काँग्रेसने आपली पकड कायम राखण्यासाठी साठ आणि सत्तरीच्या दशकात दडपशाहीचा अवलंब केला. काँग्रेसचे वर्चस्व संपविण्यासाठी डाव्या पक्षांच्या आघाडीला जुलमाविरुद्ध लढावे लागले. सुमारे साडेतीन दशकांनंतर त्याच डाव्या आघाडीची राजवट संपवून सत्तेत येण्यासाठी ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसलाही नव्वदीच्या दशकापासून रस्त्यावरील हिंसाचार आणि गळचेपीच्या तंत्राला तोंड द्यावे लागले. तृणमूल काँग्रेसला तीन वर्षांचे सत्तेचे समाधान लाभत नाही, तोच २०१४पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या भाजपच्या अत्यंत कडव्या विरोधाचा अहोरात्र सामना करावा लागत आहे. अवघी राजकीय कारकीर्द डाव्या विचारधारेशी लढण्यात गेल्यानंतर ममता बॅनर्जींवर जहाल उजव्या विचारांच्या भाजपचे आव्हान परतावून लावण्याची वेळ आली. पश्चिम बंगालमध्ये सत्ता गमावणाऱ्या राजकीय पक्षाचे किंवा आघाडीचे अस्तित्वच संपुष्टात येते. सहा दशकांहून अधिक काळ अमर्याद सत्ता गाजविणाऱ्या काँग्रेस आणि डावे पक्षांची रस्त्यावर लढण्याची क्षमता संपल्यामुळे
आज पश्चिम बंगालच्या राजकारणात ते पूर्णपणे नामशेष झाले आहेत. एकखांबी तंबू असलेला तृणमूल काँग्रेसही या संकटापासून सुरक्षित नाही याची ममता बॅनर्जी यांना कल्पना आहे. ईशान्य भारत आणि केरळप्रमाणे पश्चिम बंगालमध्ये सरकार स्थापन करणे हे संघ-भाजपचे लक्ष्य आहे. सततच्या आक्रमक डावपेचांनी नामोहरम करून सत्ताधाऱ्यांना घायकुतीस आणणे हा विरोधात असलेल्या भाजपचा सदैव सक्रिय राहण्याचा राजकीय मंत्र. त्यामुळे लागोपाठ तीनदा नेत्रदीपक विजय मिळवूनही ममता बॅनर्जी यांना प्रत्येक निवडणुकीत अस्तित्वाची लढाई लढावी लागत आहे.