

Yashwantrao Chavan Mukt Gram Vasahat
esakal
बच्चू कडू - Bacchuprahar41@gmail.com
यशवंतराव चव्हाण मुक्त ग्राम वसाहत ही केवळ बांधकामाची योजना नाही; ती माणसाला पुन्हा एकदा माणूस म्हणून उभे करण्याची, त्याला त्याचा सन्मान परत मिळवून देण्याची आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची प्रेरणादायी गाथा आहे.
एखाद्या माणसाला घर मिळणे ही गोष्ट वरकरणी साधी वाटू शकते; पण ज्याने आयुष्यभर दुसऱ्यांच्या जमिनीवर राहून, पावसात भिजून, उन्हात होरपळून अनिश्चिततेच्या सावलीत आयुष्य काढले असेल त्याच्यासाठी ते म्हणजे केवळ चार भिंती आणि एक छप्पर नसते. घर म्हणजे सुरक्षितता असते. घर म्हणजे सन्मान असतो. घर म्हणजे आपल्या मुलांच्या भविष्याची खात्री असते. घर म्हणजे माणूस म्हणून जगण्याचा अधिकार असतो.
समाजाच्या मुख्य प्रवाहात राहणाऱ्यांना घर, जमीन, सातबारा, आधार कार्ड, रहिवासी दाखला किंवा ओळखपत्र यांचे महत्त्व फारसे जाणवत नाही. कारण या गोष्टी त्यांच्या आयुष्याचा नैसर्गिक भाग असतात; परंतु समाजाच्या तळागाळात राहणाऱ्या, भूमिहीन, भटक्या-विमुक्त, दिव्यांग आणि अत्यंत गरीब कुटुंबांसाठी या गोष्टी स्वप्नाप्रमाणे असतात. काही लोकांकडे स्वतःची जमीन नसते, काही जणांकडे घर नसते; तर कोणाकडे स्वतःचे अस्तित्व सिद्ध करणारी कागदपत्रेही नसतात. अशा परिस्थितीत त्यांचे आयुष्य हे सततच्या संघर्षाचे दुसरे नाव बनून जाते.