पुणे : राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा १० एप्रिल ते १५ जूनदरम्यान गर्दीचा हंगाम सुरू होत आहे. यासाठी एसटी प्रशासनाने एक हजार ८८ अतिरिक्त गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. या गाड्या दररोज पाच लाख ६७ हजार ५२४ किलोमीटर प्रवास करतील.
एकीकडे गर्दीच्या हंगामात एसटी प्रशासन गाड्यांची संख्या वाढविते; तर दुसरीकडे तिकिटाच्या दरात हंगामी दरवाढही करते. सर्वांत जास्त गाड्या (८६) रत्नागिरी व सोलापूर विभाग आणि सर्वांत कमी गाड्या (एक) अमरावती विभाग चालविणार आहे. यवतमाळ विभाग एकही अतिरिक्त गाडी चालविणार नाही. पुणे विभागातून ६३ अतिरिक्त गाड्या धावणार आहेत.
उन्हाळ्यात सुट्टीचा हंगाम असतो. तसेच लग्न समारंभांमुळे ग्रामीण व शहरी भागात प्रवासासाठी एसटीचा पर्याय योग्य ठरतो. त्यामुळे प्रवाशांची संख्या वाढते. हे लक्षात घेऊन एसटी प्रशासनाने यंदा अतिरिक्त गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ६० टक्के भारमान असलेल्या मार्गावरच या गाड्या धावतील, असे एसटी प्रशासनाने सांगितले आहे.
विभागांना या सूचना
बसस्थानक व परिसर स्वच्छ ठेवावा
बस आतून व बाहेरून स्वच्छ असाव्यात
बसस्थानकावर प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची सोय असावी
स्वच्छतागृह स्वच्छ ठेवावे
बसस्थानकावर विजेची व्यवस्था असावी, पंखे सुरू असावेत
दहा एप्रिलपासून एसटीचा उन्हाळी सुट्टीचा हंगाम सुरू होत आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी अतिरिक्त गाड्यांची सोय केली आहे. तसेच प्रवासी सुविधेवर भर देण्याचे आदेश विभागप्रमुखांना दिले आहेत.
— अभिजित भोसले,
जनसंपर्क अधिकारी, राज्य परिवहन महामंडळ, मुंबई
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.