Kalsubai : राज्यातील १११ दिव्यांग बांधवानी कळसुबाई शिखर सात तासात केले सर

महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत रांगेतील सर्वाधिक उंचीचे कळसुबाई हे शिखर आहे. हे शिखर सर करण्याचे स्वप्न प्रत्येक ट्रेकर्सचे असते पण दिव्यांगांनी हे आवाहन पूर्ण करणे ही खरी कसोटी असते.
Muncher
Munchersakal

मंचर : महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत रांगेतील सर्वाधिक उंचीचे कळसुबाई हे शिखर आहे. हे शिखर सर करण्याचे स्वप्न प्रत्येक ट्रेकर्सचे असते पण दिव्यांगांनी हे आवाहन पूर्ण करणे ही खरी कसोटी असते. राज्यातील १११ दिव्यांगांनी एकत्र येत नववर्षाचे स्वागत व स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयाचा जल्लोष शिखरावर साजरा केला. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील ११ दिव्यांगांचा समावेश होता.

औरंगाबाद येथील शिवुर्जा प्रतिष्ठान संस्थेच्या माध्यमातून कळसुबाई शिखरावर दिव्यांगांसाठी ऊर्जा मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजीराव गाडे हे दिव्यांग असून जिद्दी व आत्मविश्वास असलेल्या दिव्यांगांसाठी ते २०१० पासून कळसुबाई शिखरावर ऊर्जा मोहिमेचे आयोजन करतात.

यावर्षी आयोजित केलेल्या अकराव्या मोहिमेसाठी आंबेगाव तालुका दिव्यांग संघटनेचे उपाध्यक्ष दिव्यांग ज्ञानेश्वर शिंदे (रा. सुलतानपूर- एकलहरे ता. आंबेगाव), जीवन टोपे, राजू सुपेकर, नवनाथ वर्प, जान्हवी बोत्रे (ता. खेङ), अर्चना घुडरे (श्री क्षेत्र आळंदी), सुरेखा ढवळे (ता. पुरंदर), रघुनाथ सातव, किरण शिपी, अनिता जाधव (ता. हवेली) यांनी सहभाग नोंदवला. अन्य जिल्ह्यातील अस्थिव्यंग, अंध, मूकबधिर, बहु विकलांग, मतिमंदसह सर्व प्रकारच्या १११ दिव्यांग सहभागी झाले होते.

बारी व जहांगीरवाडी गावातून ता. ३१ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी बारा वाजता माची मंदिरावर एकत्र आले. एकमेकांचा परिचय झाल्यानंतर प्रत्यक्ष चढाईला दुपारी दोन वाजता सुरुवात केली. एकमेकांना आधार देत घोषणा देत ,खाच, खळगे, डोंगरदऱ्या, वेडी वाकडी वळणे, झाडाझुडपातून, खडक आणि मोठाले दगड धोंडे पार करत, अनेक उभ्या चढणीच्या लोखंडी शिड्या चढाई करत रात्री सात वाजता शिखर माथ्यावर यशस्वी चढाई केली.

रात्रीचा मुक्काम शिखर माथ्यावरील विहिरीजवळ तीस कापडी तंबूत व कडाक्याच्या थंडीत केला. रविवारी (ता. १) पहाटे पुन्हा मंदिर सुळका चढाई केली तेथे नववर्षाच्या सूर्याचे स्वागत करून स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयाचा जल्लोष साजरा केला. शिखर माथ्यावरून सकाळी नऊ वाजता उतरण्यास सुरुवात केली. दुपारी एक वाजता पायथा गाठला.१११ दिव्यांगांपैकी 25 मुली व महिला होत्या तर १५ व्यक्ती ह्या १०० टक्के अंध प्रकारच्या होत्या.

त्यातील फक्त चार मुली व दोन मुलांनी सोबत मदतनीस घेतलेले होते. उर्वरित सर्वच दिव्यांगांनी विना मदतनीस कळसुबाई शिखर यशस्वी चढाई व उतराई विना अपघात पूर्ण केले.शिवुर्जा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजीराव गाडे यांच्या हस्ते ज्ञानेश्वर शिंदे यांच्यासह सर्वांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

'गेली अनेक वर्ष कळसुबाई शिखर सर करण्याची इच्छा होती. पण योग येत नव्हता व धाडसही होत नव्हते. शनिवारी (ता. ३१) दुपारी बारा वाजता बारी गावात पोहोचलो. शिखराच्या दिशेने पावले टाकण्यास सुरुवात केली. सुसाट वारा सुरू होता. आत्मविश्वास व जिद्दीने रात्री सात वाजता कळसुबाई मंदिराजवळ पोहोचलो. हा माझ्या जीवनातील सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे.'

- ज्ञानेश्वर शिंदे, उपाध्यक्ष आंबेगाव तालुका दिव्यांग संघटना.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com