पुणे : यंदा ‘बारावी’ का? अशा प्रश्नांचा वर्षभर सामना केलेल्या, सूचना, सल्ल्यांचा भडिमार झालेल्या, अपेक्षांचे ओझे पेललेल्या बारावीच्या ‘त्या’ विद्यार्थ्यांनी बोर्डाचा पहिला पेपर दिला आणि तो सुद्धा इंग्रजीचा...! गेले सुमारे दोन महिने उजळणी केलेल्या विद्यार्थ्यांची प्रातिनिधीक प्रतिक्रिया अशी : फार अवघड नव्हता, पण लिहिण्यासाठी जरा ‘लेंदी’ होता...अर्थात हुश्श झाला एकदाचा पहिला पेपर असे म्हणत हे विद्यार्थी आता पुढील विषयाच्या उजळणीला लागले आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) परीक्षेचा बुधवारी पहिला दिवस होता. बोर्डाची परीक्षा आणि त्यातही पहिलाच पेपर इंग्रजीचा असल्याने विद्यार्थ्यांपेक्षा पालकांचीच परीक्षा होती का असेही क्षणभर वाटून गेले..
पाल्य परीक्षा केंद्रावर येण्यापूर्वी त्याने सर्व साहित्य बरोबर घेतले आहे की नाही, हे पाहण्याकडे पालकांचा कटाक्ष होता. प्रवेशपत्र, पाण्याची बाटली अशा महत्त्वाच्या गोष्टी पालकांनी तयार ठेवल्या होत्या. काही पालक खास रजा काढून परिक्षा केंद्रावर पाल्याला घेऊन आल्याचे दिसले. शाळांनीही विद्यार्थ्यांच्या स्वागतापासून परीक्षा कक्षातील व्यवस्थेपर्यंत जय्यत पूर्वतयारी केल्याचे पाहायला मिळाले.
निर्धारित वेळेच्या अगोदर अर्धा तास परीक्षा केंद्रावर पोहोचण्याच्या सूचना होत्या. त्यानुसार विद्यार्थी आणि पालक वेळेत दाखल झाले. सकाळच्या सत्रात सकाळी साडेदहा वाजता परीक्षार्थी परीक्षा दालनात उपस्थित झाले. सकाळी ११ वाजता प्रश्नपत्रिकांचे वाटप झाले. मागील वर्षीप्रमाणे या वर्षीच्या परीक्षेसाठीदेखील निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे वेळ वाढवून देण्यात आली होती. त्याचा फायदा झाल्याचेही विद्यार्थ्यांनी आवर्जून सांगितले.