
यशोशिखरावर कायम राहण्यासाठी मूल्याधिष्ठित विचारसरणी हवे अधिष्ठान; गौर गोपाल दास
पुणे : ‘‘जगात परिपूर्ण असे कोणीही नसते. प्रत्येकामध्ये छोटे-मोठे दोष हे असतातच. परंतु त्या दोषांकडे दुर्लक्ष करून त्या व्यक्तीच्या गुणांवर लक्ष केंद्रित करावे. कोणत्याही क्षेत्रात यशोशिखर गाठणे तितकेसे कठीण नसून त्या यशोशिखरावर कायम राहणे कठीण असते. यशोशिखरावर कायम टिकून राहण्यासाठी मूल्याधिष्ठित विचारसरणी, आपली कुटुंब व्यवस्था आणि संस्कृती यांचे अधिष्ठान असणे आवश्यक आहे. ,’’ असे सल्ला आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जीवन मार्गदर्शक व ‘इस्कॉन’चे गौर गोपाल दास यांनी दिला.
भारती अभिमत विद्यापीठाच्या ५८ व्या वर्धापनदिन सोहळ्यात दास बोलत होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख, ‘स्ट्रेटर्जिक फोरसाइट ग्रुप’चे अध्यक्ष संदीप वासलेकर, विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, राज्याचे कृषी व सहकार राज्यमंत्री आणि विद्यापीठाचे कार्यवाह डॉ. विश्वजीत कदम, आमदार मोहनराव कदम, शालेय समितीच्या अध्यक्षा विजयमाला कदम, कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, उपाध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते, कार्याध्यक्ष आनंदराव पाटील, भारती हॉस्पिटलच्या कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. भारती विद्यापीठाच्या स्कूल ऑफ फिजिओथेरपीचे उदघाटन आणि ‘विचारभारती’ मुखपत्राच्या वर्धापनदिन विशेषांकाचे प्रकाशन देशमुख यांच्या हस्ते झाले. कोरोना काळात रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्टरांचाही विशेष सत्कार करण्यात आला. तसेच संस्थेतील योगदानाबद्दल शिक्षक व शिक्षकेत्तर सेवक यांचा ‘डॉ पतंगराव कदम सेवा गौरव पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला.
देशमुख म्हणाले, ‘‘शैक्षणिक अवकाशात भारती विद्यापीठाने आपली मोहोर उमटवलेली आहे. या विद्यापीठाने राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर रोवलेले झेंडे ही अभिमानास्पद बाब असून मातीशी नाळ घट्ट जोडताना मराठवाड्यात देखील कार्याचा विस्तार करावा.’’ वासलेकर म्हणाले,‘‘शिक्षण आणि संशोधनावर देशाचे भवितव्य अवलंबून आहे. आगामी काळात बदलते पर्यावरण हा कळीचा मुद्दा असणार आहे.’’
‘‘संशोधन हा विद्यापीठाचा आत्मा असून विद्यापीठात समाजोयोगी संशोधन होणे गरजेचे आहे,’’ असे डॉ. शिवाजीराव कदम यांनी सुचविले. विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ जे.आर.डी. टाटा, डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या नावे रिसर्च फेलोशिप सुरु करणार असल्याची घोषणा यावेळी डॉ. विश्वजीत कदम यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र उत्तुरकर आणि डॉ ज्योती मंडलिक यांनी केले. तर डॉ. एम. एस. सगरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
‘‘चूक होणे ही प्रकृती आहे, चूक मान्य करणे ही संस्कृती आहे, तर चूक सुधारणे ही प्रगती आहे. आयुष्याची वाटचाल करीत असताना कधीही टोकाची भूमिका घेऊन चालत नाही. दुसऱ्यांना दोष देत जबाबदारी टाळण्याऐवजी नैतिक मूल्यांची जोपासना करून प्रचंड मेहनतीने मिळवलेल्या यशाची उंची कायम टिकते.’’
- गौर गोपाल दास, जीवन मार्गदर्शक ‘इस्कॉन’
Web Title: 58th Anniversary Of Bharati University In Order To Remain The Pinnacle Of Success Value Based Thinking Is Required Gaur Gopal Das
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..