इथेच पंढरी अन् इथेच पांडुरंग!

Pandurang
Pandurang

कोरोनामुळे सगळ्या जगाचे व्यवहार विस्कळीत झाले आहेत. त्यामुळेच, काही शतकांचा इतिहास असलेली आषाढी वारी यंदा कशा प्रकारे पार पडणार, याबद्दल सध्या अनिश्‍चितता आहे. त्यासंदर्भात...

कोरोनाच्या जागतिक फैलावामुळे भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. या आजाराची दहशत एवढी आहे, की अनेक ठिकाणी भक्तगणांनी देवादिकांच्या मूर्तींनाही मास्क लावले आहेत. या वैश्विक महामारीत दैवी शक्तीही हतबल झाली आहे आणि तिचे संरक्षण करण्यासाठी तिलाही अशा उपायांची गरज आहे, असे त्यांना वाटत आहे. जग-कोरोनाच्या आधीचे आणि नंतरचे, असे सरळ दोन टप्पे आता झाले आहेत. पूर्वीच्या अनेक बऱ्या-वाईट गोष्टींना निरोप द्यावा लागणार आहे. समाजात वावरताना एकमेकांत ठरावीक अंतर राखणे, अनिवार्य झाले आहे. ते शक्‍य व्हावे, यासाठी देशभरातील बव्हंशी मोठी प्रार्थनास्थळे भाविकांसाठी बंद करण्यात आली आहेत. तेथील पूजाअर्चा, अन्य कार्यक्रम यांच्या स्वरूपावर, सहभागावर मर्यादा आल्या आहेत.

याच पार्श्वभूमीवर, एरवी लाखो वारकऱ्यांच्या साक्षीने निघणाऱ्या आषाढी वारीचे नियोजन यंदा कसे करायचे, असा गहन प्रश्न पालखी सोहळाप्रमुख आणि सरकारपुढे निर्माण झाला आहे. नियोजित वेळापत्रकानुसार संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान १२ जून रोजी; तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान १३ जून रोजी अनुक्रमे देहू आणि आळंदीतून होणे अपेक्षित आहे. या संतश्रेष्ठांबरोबरच राज्यभरातून अन्य पालख्याही पंढरपूरकडे मार्गस्थ होत असतात.

सामाजिक अंतराचा प्रश्‍न
पालख्यांनी पारंपरिक पद्धतीने जायचे म्हटले, तर वैष्णवांच्या जनसागरात एकमेकांत सुरक्षित अंतर राखले जाणे अशक्‍यप्राय आहे. त्यामुळे अन्य पर्यायांवर वारकरी आणि राज्य सरकार यांच्यात चर्चा सुरू आहे. ‘निवडक वारकरी सोबत घेऊन पालखी नेहमीप्रमाणे जाऊ द्यावी,’ असे काहींचे म्हणणे आहे. तथापि, पालखीबरोबर प्रातिनिधिक स्वरूपात मोजक्‍या व्यक्तींनी जावे, हे मान्य झाले, तरी मार्गावर दर्शनासाठी भाविकांची झुंबड उडणार. त्यांना रोखणे सोपे नाही. त्यामुळे रस्त्यात कोठेही न थांबता, संतांच्या पादुका वाहनातून थेट पंढरपूरला नेणे, हा मांडला गेलेला पर्याय अधिक व्यावहारिक आहे. एका मठाच्या प्रमुखांनी तर या पादुका हवाईमार्गेही नेता येतील, असे सुचविले आहे. 

दुर्दैवाची बाब म्हणजे, काही जण या विषयाचेही राजकारण करू पाहात आहेत. कोरोनाचे संकट सभोवताली घोंगावत असताना, ‘नेहमीच्याच पद्धतीने पालख्या निघाल्या पाहिजेत. त्यासाठी सरकारने आवश्‍यक ती व्यवस्था करावी’, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. या आशयाचे त्यांचे संदेश समाज माध्यमांवर फिरू लागले आहेत. राजकीय कुरघोड्या करण्याची ही वेळ नाही, याचे भान संबंधितांनी ठेवले पाहिजे. 

माणसातील ‘पांडुरंग’ शोधूयात
राज्य सरकार वारकऱ्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून महिनाअखेरीस याबाबत निर्णय घेणार आहे. हा विचारविनिमय होत असताना धार्मिक, भावनिक मुद्‌द्‌यांपेक्षा विद्यमान आपत्तीचे रौद्र स्वरूप अधिक विचारात घेतले पाहिजे. अमुक एक गोष्ट काही शतकांपासून चालत आली आहे, म्हणून या महासंकटातही तीत बदल करणार नाही, हा अट्टहास समर्थनीय नाही. ‘ईश्वर चराचरांत वसलेला आहे, तो प्रत्येक व्यक्तीत आहे,’ असे संतांनी सांगितले आहे. त्यामुळे यंदाच्या असाधारण परिस्थितीत पंढरीला जाण्याऐवजी, संकटग्रस्त माणसाला मदतीचा हात देऊन त्याच्यातील पांडुरंगाला नमन करूयात. पायी केलेल्या वारीपेक्षाही अधिक पुण्य यात लाभेल, अशी श्रद्धा ठेवायला काय हरकत आहे?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com