पुण्याची जिद्दी कन्या, बाळंतपणातून उठून लढतेय ओडिशात कोरोनाची लढाई... 

aboli naravane
aboli naravane

पुणे : देशभरात कोरोना हाहाकार घालत असताना त्या आपल्या तान्हुलीशी घरात खेळत असायच्या...मात्र, त्यावेळी त्यांचे एक मन आई म्हणून मुली सोबत खेळायला सांगायचे, तर दुसरे मन आपण अधिकारी आहोत, आपली गरज आता जनतेची सेवा करण्यासाठी आहे, असे सांगायचे. या द्वंद्वात त्यांच्यातील अधिकाऱ्याने त्यांच्यातील आईवर मात केली. आणि त्यांनी आपली प्रसूती रजा रद्द केली आणि थेट कोरोनाच्या लढाईत सर्व ताकदीनिशी उतरल्या.

पुण्याची कन्या असलेल्या या जिद्दी मराठी मुलीचे नाव आहे, अबोली नरवणे! त्या ओडिशातील राउरकेला येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी या पदावर काम पाहत आहेत. 

ओडिशातील राऊरकेला येथे कोरोना बाधितांची संख्या वाढत गेली. लॉकडाउन जाहीर करण्यात आले. त्यावेळी अबोली नरवणे प्रसूती रजेवर होत्या. आपल्या जिल्ह्यातील परिस्थिती पाहून त्या लगेच कामावर हजर झाल्या आणि त्यांनी आपल्या सहा महिन्यांच्या मुलीला सांभाळत सगळी सूत्रे हाती घेतली. डॉक्‍टर, परिचारिका, पोलिस, स्वच्छता कामगार यांच्याशी बोलून त्यांनी नियोजन केले आणि कामाला वेग दिला. तोवर कोरोनाबाधितांची संख्या तीन हजारांवर पोचली होती. त्यामुळे नरवणे यांनी बाधितांच्या विलगीकरणाला प्राधान्य दिले आणि लवकरच कोरोना संशयितांची संख्या एक हजारपर्यंत खाली आणण्यात यश मिळवले. त्यातून आता येथे फक्त पाच- सहा कोरोनाबाधित आहेत. 

नरवणे यांनी कार्यक्रम आखून दिला होता. जिल्ह्याबाहेरून आलेल्या प्रत्येक व्यक्तीची तपासणी केली गेली. येणाऱ्या- जाणाऱ्यांच्या नोंदी करून त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले. बाधितांना व रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. या व्यक्ती पळून जाणार नाहीत, याची काळजी घेण्यात आली. सर्व व्यवहार बंद करण्यात आलेल्या भागात दूध, औषधे व जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा करण्यात येत होता. त्याचबरोबर हातावर पोट असलेले मजूर, पारधी, तृतीयपंथी, स्थलांतरित कामगार, भिकारी, बेघर अशा लोकांना शोधून, त्यांच्यासाठी तयार अन्न पोचवण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे जीवनावश्‍यक वस्तूंचे भाव वाढू नयेत, याची काळजी त्यांनी घेतली. 

पुण्यातील विमलाबाई गरवारे प्रशाला व फर्ग्युसन महाविद्यालय येथे शिक्षण घेतलेल्या नरवणे आपल्या बॅचचे अन्य अधिकारीही खूप मेहनत घेत असल्याचे आवर्जून सांगतात. त्या म्हणाल्या, ""पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी या दिवसात महिलांवरील घरगुती हिंसाचाराला प्रतिबंध व्हावा, म्हणून कडक पावले उचलली आहेत. कटकच्या अनन्या दास यांनी त्यांच्या अखत्यारीतील परिसरात एकही व्यक्ती उपाशी राहणार नाही, यासाठी अविरत काम केले आहे. पंजाबमध्ये आदित्य उप्पल यांनी कोरोनाबाधितांची संख्या शून्यावर आणली आहे. विशाखापट्टणच्या पोलिस आयुक्त प्रसूतीनंतर केवळ बावीस दिवसात कामावर रुजू झाल्या आहेत, मला माझ्या या सगळ्या मित्रांचा अभिमान वाटतो.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com