हडपसर : देशाचे पंतप्रधान नागरिकत्व कायद्याच्या माध्यमातून जातिवाद पसवण्याचे काम करीत आहे. त्यामुळे काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत अशांतता माजली आहे. एनआरसी व सीएए कायद्याला विरोध असून हा कायदा रद्द झाला नाही तर इंग्रजांविरोधात जसे असहकार आंदोलन उभारले, त्याप्रमाणे केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन उभारले जाईल असा इशारा समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी दिला.
कोंढवा खुर्द येथे नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) हे दोन कायदे रद्द करण्यासाठी कोंढव्यात सुरू असलेल्या महिलांचे धरणे आंदोलन सुरू आहे, यावेळी आझमी बोलत होते.
आझमी पुढे म्हणाले, सरकार झुकेपर्यंत विरोधात आंदोलन सुरू राहील. सरकार मानले नाही तर, पुढे 'करो या मरो'ची रणनिती राहिल. हे कायदे रद्द करण्याबाबत सरकार मानत नसेल तर इंग्रजावेळी झालेल्या आंदोलनासारखे आंदोलन सुरू करू, देशाचा कायदा डॅा. बाबसाहेब आंबेडकर यांनी बनविला. मात्र, आजच्या सरकारने मनमानी कारभार चालविला आहे. धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम सरकार करीत आहे. मात्र, आम्ही असे होऊ देणार नाही. संविधान वाचविण्यासाठी जीवाची बाजी लावू.
गृहनिर्माण विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले, भारतामध्ये सहा हजार जाती आहेत की ज्यांच्याकडे घर किंवा दाखले नाहीत. त्यामुळे ही लढाई गरीब जनता आणि श्रीमंत जनता अशी आहे. माझी जात वंजारी आहे व नागरिकत्व सुधारणा कायदा माझ्या जातीविरूध्द आहे. माझया जातीतील 50 टक्के लोक शेतमजुरी करतात. शेतमजूरी करत असताना शेतामध्येच त्यांचे बाळंतपण होते. त्यामुळे त्यांच्याकडे दाखले नाहीत. त्यामुळे कोणतेही पुरावे त्यांच्याकडे नसल्याने ते नागरिकत्व कोणत्या आधारे सिध्द करणार असा प्रश्न आहे. हे दोन्ही कायदे घटनाबाह्य असून घटनेच्या मुळावर घाला घालणारा आहे. त्यामुळे या कायदया विरोधात सुरू असलेल्या लढयाला माझा पाठींबा आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.