
पिंपरी : ‘‘ह्रदयात राम आणि हाताला काम’, ‘प्राण जाये पर, वचन न जाये’ असे आमचे हिंदुत्व आहे,’’ असा नारा युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी रविवारी दिला. धर्माधर्मात, जातीजातीत, जिल्ह्याजिल्ह्यात वाद निर्माण करणे, हे भारतीय जनता पक्षाचे हिंदुत्व आहे, अशी टिकाही त्यांनी केली.
केंद्र व राज्य सरकारचा कारभार आणि आमदार अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या चुकीच्या निर्णयाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची सभा रविवारी पिंपरीत झाली.
त्यात युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे बोलत होते. तत्पुर्वी निगडी येथील भक्तीशक्ती चौकात त्यांचे स्वागत केले. तेथून पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत दुचाकी फेरी काढली.
तिथे झालेल्या सभेस जिल्हा संपर्कप्रमुख तथा आमदार सचिन अहिर, राज्य संघटक गोविंद घोळवे, एकनाथ पवार, मावळ लोकसभा मतदारसंघ संघटक संजोग वाघेरे, शहरप्रमुख ॲड. सचिन भोसले, माजी आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार, जिल्हा संघटिका सुलभा उबाळे आदी उपस्थित होते.
पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या हातात, ‘ईव्हीम हटाव, संविधान बचाव’ असा फलक होता. त्याला उद्देशून ठाकरे म्हणाले, ‘‘ईव्हीएमपेक्षाही खोके सरकारपासून महाराष्ट्र बचाव, असा नारा लावायची वेळ आलेली आहे.
दोन पक्ष व एक कुटुंब फोडून अवकाळी सरकार आमच्या डोक्यावर बसवलं आहे. चाळीस चोरींची ही टोळी आहे. त्यांचे नेतृत्व करणारे मुख्यमंत्री घटनाबाह्य आहेत. पण, सध्याचे वर्ष निवडणुकांचे असून आमचे आहे.
पुढील दोन महिन्यांनी लोकसभेची निवडणूक होईल, कदाचित विधानसभेचही निवडणूक होईल. त्यानंतर आमचे सरकार येणार आहे. त्यावेळी घोटाळेबाज मंत्र्यांना अगोदर जेलमध्ये टाकू,’’ असा इशारा देत, मुख्यमंत्र्यांमध्ये हिम्मत असेल तर, त्यांनी राज्यहिताचा निर्णय घेऊन दाखवावा, असे आव्हानही आदित्य ठाकरे यांनी दिले.
सुलभा उभाळे, गोविंद घोळवे यांचीही भाषणे झाली. काही कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला, त्यांचे स्वागत ठाकरे यांनी केले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष तथा माजी महापौर संजोग वाघेरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात गेल्या महिन्यात प्रवेश केला आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी मिळणार का?
असे सभा संपल्यानंतर पत्रकारांनी विचारले असता, आदित्य ठाकरे म्हणाले, ‘‘संजोग वाघेरे यांनी संघटक म्हणून जबाबदारी घेतलेली आहे. लोकसभा वा विधानसभेच्या उमेदवारीबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वरिष्ठ नेते घेत असतात.
तिकिट वाटपात मी जात नाही. पण, केवळ मावळच नाही तर, राज्यातील प्रत्येक लोकसभा व विधानसभा मतदारसंघ आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. गेल्या दोन वर्षात खूप अन्याय महाराष्ट्र सहन करत आहे.
आमच्या हक्काचा रोजगार असलेला प्रत्येक उद्योग परराज्यात पाठविला जात आहे. त्यामुळे राज्यातील प्रत्येक क्षेत्र कोलमडलं आहे. मुख्यमंत्री अकार्यक्षम आहेत. त्यांच्यावर उद्योजकांचा विश्वास नसावा, त्यामुळे ते अन्य राज्यात जात असावेत.
हे थांबविण्यासाठी आणि दिल्लीत महाराष्ट्राचा आवाज बुलंद करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जागेवर महाविकास आघाडी जिंकणं महत्त्वाचं आहे. आमची स्थानिक टीम शहरात चांगले काम करीत आहे. शहरात नागरीकरण वाढत आहे.
देशभरातून लोक इथे आले आहेत. एक चांगलं शहर पिंपरी-चिंचवड होऊ शकते. आमच्या सरकारने शहरांच्या विकासावर भर दिला होता. पुढील पन्नास वर्षांचा विचार करून शाश्वत विकास साधला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे.’’
उद्योगमंत्री उदय सामंत यांना त्यांच्या खात्याविषयीच फारसी माहिती नाही, अशी टिका करत ‘इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी सर्व विभागांची सांगड घालणं गरजेचे असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. ते म्हणाले. ‘‘अयोध्येत आम्ही नंतर जाणार आहोत. उद्या सोमवारी नाशिकच्या काळाराम मंदिरात जात आहोत.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.