जाहिरातींचे होर्डिंग पुणेकरांच्या जिवावर;अपघातांची जबाबदारी अधिकाऱ्यांवर निश्‍चित करा

Hoardings
Hoardings

पुणे - पुणे शहराच्या काही भागात चुकीच्या पद्धतीने जाहिरात फलक (होर्डिंग) उभारले आहेत, परवानगीच्या तुलनेत फलकांची उंची आणि आकार वाढवला गेला आहे, फलकांच्या उभारणीचे "ऑडिट' होत नाही; त्यामुळे ते धोकादायक झाल्याने पादचारी आणि वाहनचालकांसाठी जीवघेणे ठरू शकतात...ही काही सामान्य पुणेकरांनी व्यक्त केलेली भीती नसून, खुद्द नगरसेवकांनीच व्यक्त केली आहे. अशा फलकांमुळे अपघात झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर निश्‍चित करून कारवाई करावी, असा आग्रह नगरसेवकांचा आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या विषयातील गंभीर बाब म्हणजे, जाहिरात फलक सुरक्षित असावेत, यासाठी गेल्या वर्षभरात साधारणपणे 25 नगरसेवकांनी तक्रारी करूनही त्यांची दखल घेतली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिकेची सर्वसाधारण सभा आणि स्थायी समितीच्या बैठकीतही नावापुरतीच चर्चा होत असल्याचे दिसून आले आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे शहर आणि उपनगरातील महापालिकेच्या मालकीसह खासगी मोकळ्या जागा, इमारतींवर जाहिरात फलक उभारण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आजमितीला 1 हजार 818 इतक्‍या फलकांची नोंद महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाकडे आहे. प्रत्यक्षात किमान साडेसहा-सात हजार फलक असल्याचे माहिती महापालिकेचेच अधिकारी देतात. त्यातही काही भागांत मोडकळीस आलेल्या इमारतींवर फलक लावले आहेत, जमिनीपासून 40 मीटरपेक्षा अधिक उंचीचे फलक उभारण्यास बंदी असूनही ते सर्रास लावले असल्याच्या तक्रारी नागरिकांनी महापालिकेकडे गेल्या होता. त्याची दखल घेऊन कारवाई करण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला नाही. धोकादायक फलकांचा मुद्दा उपस्थितीत करीत, अशा फलकांवर पुढच्या 15 दिवसांत कारवाई करण्याचा प्रस्ताव नगरसेवक रफीक शेख आणि नगरसेविका राजश्री काळे यांनी स्थायी समितीपुढे ठेवला आहे. यासंदर्भातील वस्तुस्थिती निदर्शनास आणू दिल्यानंतर संबंधित खात्याचे अधिकारी कार्यवाही करीत नसल्याची तक्रारही शेख आणि काळे यांनी केली आहे. त्यामुळे फलकांमुळे पादचारी, वाहनचालकांच्या जिवाला धोका झाल्यास या खात्याच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कठोर कारवाई, असेही प्रस्तावात स्पष्ट केले आहे. 

कारवाईची फक्त घोषणाच 
मंगळवार पेठेतील वर्दळीच्या रस्त्यालगतचा फलक कोसळून काही जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर सर्वच भागातील फलकांची पाहणी करण्यात येईल, असे आकाशचिन्ह विभागाने जाहीर केले होते. ही घटना घडून आता तीन वर्षे होत आली तरीही महापालिकेला एकही धोकादायक फलक सापडला नाही. नेमके कोणत्या भागांतील फलकांना परवानगी आहे, हेही महापालिकेच्या निदर्शनास आलेले नाही. त्यामुळे अशा फलकांवरील कारवाई केवळ घोषणाच राहिली आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com