राज्यपालांची स्वाक्षरी झाल्यानंतर कुलगुरू निवडीला मिळणार गती : उदय सामंत

पुणे विद्यापीठाचा प्रभारी कार्यभार डॉ. कारभारी काळे यांच्याकडे
After signature of Governor election for Vice-Chancellor Uday Samant pune
After signature of Governor election for Vice-Chancellor Uday Samant pune esakal

पुणे : ‘‘विधानसभा अधिवेशनात विद्यापीठ कायद्यातील सुधारणा विधेयक मंजूर झाल्यानंतर ते लगेचच स्वाक्षरीसाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठविण्यात आले होते. हे विधेयक लवकर स्वाक्षरी होऊन आले, तर कुलगुरू निवड प्रक्रिया लवकरात लवकर सुरू होईल,’’ असे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले. दरम्यान, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर हे सेवानिवृत्त झाल्यानंतर विद्यापीठाचा प्रभारी कार्यभार देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे (लोणेरे) कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांची निवड झाल्याचे समजले, असेही सामंत यांनी यावेळी सांगितले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवीप्रदान समारंभानंतर पत्रकारांशी संवाद साधताना सामंत यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले,‘‘विधानसभेत मंजूर झालेल्या विद्यापीठ कायद्यातील सुधारणा विधेयकानुसार कुलगुरू निवडीची प्रक्रिया व्हावी, अशा आमची भूमिका आहे. नवीन कायद्याला उशीर का झाला, याबाबत मी स्वत: राज्यपालांना भेटणार आहे. विधेयकामध्ये केवळ कुलगुरू निवड हाच एक मुद्दा नाहीये, तर अधिसभा सदस्य, व्यवस्थापन परिषद सदस्य यांनाही शैक्षणिक पात्रता लावली आहे. समान संधी मंडळ हे देशात कुठेही नाही, ते आम्ही केले. विधानसभेत विधेयक मंजूर होण्यापूर्वी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील (जळगाव) कुलगुरू निवडीची प्रक्रिया सुरू झाली होती.

त्यामुळे तेथील कुलगुरू निवड पूर्वीच्या पद्धतीने झाली. परंतु आता विद्यापीठ कायद्यात केलेल्या बदलांनुसार ही प्रक्रिया व्हावी, यासाठी आम्ही आग्रही आहोत.’’ राज्यपालांचे अधिकार कोठेही कमी केले नसून घटनात्मक सर्व अधिकार त्यांना असल्याचेही सामंत यांनी यावेळी नमूद केले. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा प्रभारी कार्यभार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्याकडे दिला असल्याचे कळले, असेही सामंत यांनी सांगितले. सीईटीची पूर्ण तयारी झाल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

विद्यार्थ्यांनी स्वत:च्या भविष्याचा विचार करावा

‘‘कोरोना संपल्यानंतरही ऑनलाइन परीक्षा घेतल्यास त्यांचा विद्यार्थ्यांच्या नोकरीवर आणि उद्योगधंद्यावर परिणाम होऊ शकतो, असे औद्योगिक क्षेत्रातील मान्यवरांचे म्हणणे आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी तासाला पंधरा मिनिटे वाढवून दिली, तर दोन पेपर मध्ये पुरेसे अंतर ठेवले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वत:च्या भविष्याचा विचार करायला हवा आणि ऑफलाइन परीक्षेला सामोरे जावे,’’ असे सामंत यांनी सांगितले.

प्राध्यापक भरतीला सुरवात

‘‘प्राध्यापक भरतीबाबत राज्य सरकारने दोन अध्यादेश काढले आहेत. एकामध्ये भरती प्रक्रियेला सुरवात करण्याचे आदेश दिले आहेत. तर दुसऱ्यात दोन हजार ९९ संवर्गनिहाय प्राध्यापक भरतीला मान्यता दिली आहे. आता विद्यापीठांमधील ५६९ प्राध्यापकांची भरती करायची आहे. याबाबत संस्थांनी बिंदूनामवली, आकृतिबंध तयार करावा आणि नियमानुसार भरती करावी.’’, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com