
पुणे : आपण संविधानाला मानणारे आपण आहोत. अलीकडच्या काळात काही जण गळा घोटण्याचा प्रकार करत आहेत. आपल्याकडून असे काम होणार नाही, लोकशाहीला धब्बा लागणार नाही याची काळजी घ्यावी, अशा शब्दात विधानसभेचे माजी विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी भाजपवर अप्रत्यक्ष टीका केली.
आद्यक्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे स्मारक समितीच्या वतीने क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त पुरस्कार वितरण करण्यात आले. यावेळी पवार बोलत होते. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार चेतन तुपे, माजी मंत्री रमेश बागवे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे शहर प्रमुख गजानन थरकुडे, अंकुश काकडे, स्मारक समितीचे अध्यक्ष विजय डाकले आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, लहूजी वस्ताद साळवे यांचे स्मारक गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून रखडलेले होते. या स्मारकाचे काम करण्याची संधी आम्हाला मिळाली. राज्य सरकारने ८७ कोटी ११ लाख रुपयांचा धनादेश महापालिकेला दिला. महाविकास आघाडी सरकार असताना मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी नेहमीच चांगल्या कामाला पाठिंबा दिला. त्यामुळेच स्मारकाच्या जागेचे भूसंपादन करू शकलो. यंदाच्या दिवाळी पाडव्याला जागेच्या सीमा भिंतींचे काम केलं. स्मारकाचे काम यापूर्वीच केलं पाहिजे होते. पण आपल्या विचारांची महापालिकेत सत्ता नव्हती, त्यामुळे अडचणी आल्या. आता हे स्मारक भव्यदिव्य स्वरूपाचे झाले पाहिजे. त्यासाठी काही विधायक सूचना असतील ते लक्षात आणून द्या. महानगरपालिकेत आता प्रशासकीय राज आहे, त्यांच्या मागे लागे लागून काम करून घेतले पाहिजे, त्यामुळे चांगला कंत्राटदाराकडून या स्मारकाचे काम झालं पाहिजे. यासाठी पाठपुरावा करणे आवश्यक आहे.
लहूजी वस्ताद यांचे कार्य अनेकांना माहिती नाही हे दुर्दैवी आहे. त्यांचे काम सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. लहूजी वस्ताद यांच्या आग्रहामुळे सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेल्या शाळेत मुली जाऊ लागल्या. पहिली विद्यार्थिनी मुक्ता साळवे ही लहूजी यांची नातलग होती. आपण संविधानाला मानणारे आहोत, लोकशाहीला धब्बा लागणार नाही, अलीकडच्या काळात काही जण गळा घोटण्याचा प्रकार करत आहेत. आपल्याकडून असे काम होणार नाही याची काळजी घ्यावी.
मरेल तर सत्तेसाठी जगेल तर सत्तेसाठी
दानवे म्हणाले, महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर स्मारक समितीसाठी जागा उपलब्ध करून दिली. या इतिहासात वीर लहूजी वस्ताद सारखे लोक क्रांतीची ज्योत पेटवली. लहूजी वस्ताद यांनी ‘मरेल तर देशासाठी आणि जगेल तर देशासाठी’ असे ठरवले होते. पण आजच्या स्थितीत ‘मरेल तर सत्तेसाठी आणि जगेल तर सत्तेसाठी’ अशा विचाराचे लोक आहेत. क्रांतिवीर लहूजी वस्ताद यांच्या विचारांची आजच्या काळात गरज आहे. आपला समाज खऱ्या अर्थाने पुढे जाईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.