हिवताप प्रतिबंधासाठी नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन

पावसाळ्यात हिवतापासारख्या किटकजन्य आजारांची साथ वाढण्याचा धोका असतो. हिवताप हा आजार डासांपासून होत असतो.
maleria
maleriasakal
Summary

पावसाळ्यात हिवतापासारख्या किटकजन्य आजारांची साथ वाढण्याचा धोका असतो. हिवताप हा आजार डासांपासून होत असतो.

पुणे - पावसाळ्यात हिवतापासारख्या किटकजन्य आजारांची साथ वाढण्याचा धोका असतो. हिवताप हा आजार डासांपासून होत असतो. त्यामुळे हिवताप प्रतिबंधासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी दर आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने दरवर्षी जून महिन्यात हिवताप प्रतिबंधक अभियानाची अंमलबजावणी केली जाते. या अभियानांतर्गत आठवड्यातून एक दिवस पाण्याचा साठा असलेली सर्व भांडी रिकामी केली जातात. ही भांडी घासून-पुसून कोरडी केली जातात आणि घरातील सर्व पाणीसाठे झाकून ठेवण्याचे आवाहन केले जाते. यामुळे डासांचा प्रादुर्भाव रोखण्यात मदत होते, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी सांगितले.

ते म्हणाले, ‘‘दरवर्षी जून महिन्यात पाऊस कधी कमी, तर कधी जास्त प्रमाणात पडत असतो. यामुळे डासांना पोषक वातावरण तयार होते. परिणामी डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर होत असते. या डासांमुळे आणि पावसाळ्यातील दूषित पाण्यामुळे कीटकजन्य व जलजन्य आजार उदभवत असतात. या जलजन्य आणि किटकजन्य आजारांना आळा घालण्यासाठी आपापले घर आणि घराच्या परिसरातील सर्व पाणीसाठे रिकामे करणे, कोरडा दिवस पाळणे, पिण्याच्या पाण्याचे साठे झाकून ठेवणे, किटक प्रतिबंधात्मक औषधांची फवारणी करणे आदी उपाययोजना करणे गरजेचे असते. डेंगी व हिवताप या आजारांचे प्रसार करणारे डास हे घरातील मनिप्लांट, फ्रिज, कुलर, जमिनीतील पाण्याची टाकी, प्लास्टिकच्या टाक्या, घराच्या परिसरात पडून असलेले आणि वापरात नसलेले टायर, प्लास्टिक कुंड्या, प्लास्टिकच्या वस्तूंमध्ये साठलेल्या स्वच्छ पाण्यात अंडी घालत असतात. याला आळा घालण्यासाठी आरोग्य विभागाच्या जोडीला लोकसहभाग महत्त्वाचा असतो.’’

नागरिकांनी काय काळजी घ्यावी

  • डासांपासून संरक्षणासाठी झोपताना मच्छरदाणीचा वापर करा.

  • घर, घराच्या परिसरात नारळाच्या कवट्या, टायरमध्ये पाणी साचू देऊ नका.

  • डासांना घरात येण्यास रोखण्यासाठी घराच्या खिडक्यांना जाळ्या बसवा.

  • घराच्या परिसरातील अडगळीचे साहित्य नष्ट करा.

  • घर व घराचा परिसर स्वच्छ ठेवा.

  • ताप येताच वैद्यकीय अधिकाऱ्यांचा त्वरित सल्ला घेऊन औषधोपचार सुरु करा.

  • अंगावर ताप काढू नका.

पावसाळ्यात जिल्ह्यातील कोणत्याही गावात किंवा वाडी-वस्तीवर साथीचे रोग उद्भवणार नाहीत, याची दक्षता आरोग्य विभागाच्यावतीने आतापासूनच घेण्यात येत आहे. यासाठी गावा-गावातील पिण्याच्या पाण्याचे स्रोत, विहिरी, हातपंप, हॉटेल, टँकरची स्वच्छता नियमितपणे केली जाणार आहे. शिवाय पाण्याचे शुद्धीकरण करणे, सांडपाण्याची विल्हेवाट लावणे, धूरफवारणी करणे आदी उपाययोजना केल्या जाणार आहेत.

- डॉ. भगवान पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com