पुण्यात अचानक धरण फुटलं अन् सगळं होत्याचं नव्हतं झाल पण...

panshet dam.jpg
panshet dam.jpg

12 जुलै 1961 चा दिवस. पावसाची रिपरिप होती. पण अगदीच सर्वसाधारण. नेहमीप्रमाणे आम्ही दोघे (हे आणि मी) ऑफिसला गेलो. विश्रामबाग वाड्यातून आत्ताच्या ठिकाणी नदीकिनारी महानगरपालिका स्थलांतरित झाली होती. साडेदहाच्या सुमारास आम्ही ऑफिसला पोहोचलो. तेव्हा त्यावेळचे डेप्युटी इंजिनिअर तांबे साहेब सर्वांना ओरडून सांगत होते,  “धरण फुटलं पाणी येईल. घरी पळा. घरी पळा.”  तरी बायका पुरुषांचे घोळके उभे होते.  

आम्ही ४-५ बायका (त्या वेळी माझी आई पण महानगरपालिकेत होती),  पाणी पाहण्यासाठी नदीच्याकडेने लकडी पुलाकडे (म्हणजे आत्ताचा संभाजी पूल) चालू लागलो. पोलिस पुलावर जाऊ देत नव्हते. मग मात्र आमचे धाबे दणाणले.  आता, नदीच्या पलिकडे कसे जायचे हा प्रश्न पडला. एक रिक्षा मिळाली. एका मैत्रिणीच लहान मुल घरी होतं ती त्यातून गेली. दैवयोगाने मला आणि आईला पण रिक्षा मिळाली.  रिक्षाने नव्या पुलापर्यंत आलो तोही बंद.  रिक्षावाला अगदी देवासारखा होता.  त्याने संगम पुलावर रिक्षा नेली, तो पूल चालू होता. आम्ही एकदाचे गावात आलो. मला गुरुवार पेठेत पोचवून, आई सदाशिव पेठ येथे तिच्या घरी गेली. घरी यांनी मला चांगलं झापलं. कारण पोलिस हाकलेस्तोवर हे नव्या पुलावर माझी वाट पाहत होते.

रेडिओवरून थोडाफार बातम्या कळत होत्या.  सदाशिव , नारायण, शनिवार,  शिवाजीनगर नदीकाठचा भाग सर्व पाण्याखाली गेला. पाणी आलं, घरं पडली, माणसं, गुरे, सामान-सुमान वाहून जात होती. एका पाळण्यात गादीवर एक बाळ झोपलं होतं. तो पाळणा चक्क तरंगाला. त्या बाळाच्या नाका-तोंडातही पाणी गेलं  नाही. लोकांनी मग त्याला बाहेर काढून वाचवलं. आज हे बाळ ६० वर्षाचं झालं असेल. देव तरी त्याला कोण मारी!  ह्या चमत्कारावर प्रा. प्रभाकर ताम्हणे यांनी दिवाळी अंकात गोष्ट लिहिली होती. “बाळा, इथे आपलं घर होतं.”

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

माझी धाकटी बहीण आशा, त्यावेळी शंभरेक मुलांबरोबर जनगणनेच्या ऑफिसमध्ये काम करत होती. त्यांना तिथेच खायला-प्यायला घालून रात्रभर ठेवून घेतलं होतं.  दुसऱ्या दिवशी लकडी पुलाची दुरवस्था झालेली असताना ही शंभर – सव्वाशे तरुण मुलं एकमेकांचा हात धरून मोठी रांग करून मोडका पूल ओलांडून कशी तरी नदीच्या दुसऱ्या बाजूला आली. तो पर्यंत आम्ही सगळे काळजीतच होतो. पाणी आलं आणि ओसरलं  पुन्हा  पुणेकर संध्याकाळी नदीकाठी धावलेचं. आम्हीसुद्धा.

दुसऱ्या दिवशी पुन्हा “पाणी आलं पाणी आलं” करून आरडाओरडा सुरू झाला. लोक पर्वतीकडे  धावायला लागले. आम्ही गुरुवार पेठेत उंचावर. आईला आणि भावंडांना सदाशिव पेठेतून आमच्याकडे आणायला दिरांना पाठवल. पण आई आली नाही.  आणि थोडे दागिने आणि कपडे आईने एका बॅगेत भरून पाठवले. ही अफवा आहे म्हणून लोकांना कळले. धावाधाव थांबली. लाईट गेले होते. नळाला पाणी नव्हतं. 

विहिरीवरून लोक पाणी आणत होते. त्यावेळी पुण्यात भरपूर विहिरी होत्या. एक रिटायर्ड इंजिनियर ठोसर म्हणून होते.  त्यांनी काहीतरी युक्ती काढून कालवे जोडून पिण्याच्या पाण्याची सोय केली. त्यामुळे लवकर पाणी मिळालं. वीज बंद, गिरण्या बंद  मला तर माझ्या मामे  सासूबाईंनी मुंबईहून पीठ आणि इतरही सामान पाठवलं.लदोन दिवसांनी आम्ही ऑफिसमध्ये गेलो. संपूर्ण तळमजला पाण्याखाली होता. आमचं करसंकलन खाते, ट्रेझरी, ऑडिट सगळीकडे पाणी भरले होते. कोणाच्या तरी सुपीक डोक्यातून आमच्या कराच्या रजिस्टरना कातडी कवर घातली होती.  त्यामुळे आमची रजिस्टर भिजली नाहीत - हिशोबाचा घोळ झाला नाही.  12 जुलैच्या सर्व कहाण्या सदैव स्मरणात राहील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com