बातमी पलीकडे : लढाई जिंकायची की लांबवायची ?

Corona l0
Corona l0

महिनाभरापूर्वी आपण जगभरात कोरोनाने घातलेल्या थैमानाच्या बातम्या वाचत होतो. चीन, युरोप सारखे प्रगत देश स्वतःची काळजी कशी घेऊ शकत नाहीत, यावर चर्चा करत होतो, मात्र कोरोनाचा राक्षस कधी आपल्या घरात घुसला, हे आपल्याला कळाले देखील नाही. तरीही कोरोनाने पूर्वतयारीसाठी आपल्याला भरपूर वेळ दिला, यावेळचा उपयोग मात्र आपल्याला करता आला नाही, ही वस्तुस्थिती आहे.

आता आपली परिस्थिती इटली, अमेरिकेपेक्षा फारशी वेगळी राहिलेली नाही, हे स्पष्टपणे बोलावेच लागेल. एका बाजूला भयानक जीवघेण्या रोगाशी सामना आणि दुसरीकडे लाॅकडाऊन मध्ये अडकलेली दररोजच्या जगण्याची लढाई, अशा दुहेरी संकटात आपण सापडलो आहोत. दोन्ही संकटे तेवढीच जीवघेणी आहेत, पण कोरोनाला हद्दपार केल्याशिवाय दुसरी लढाई अशक्य आहे. अशावेळी आपल्या हातात असलेल्या पंधरा दिवसांचा पुणेकर कसा वापर करून घेतात, यावरच हे युद्ध आणखी किती काळ लांबणार हे ठरणार आहे. 

पुणे शहर आणि जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या दररोज शंभराच्या पटीत वाढत आहे. शहरातील झोपडपट्टी भागात अद्यापही आपल्याला नियंत्रण ठेवता आलेले नाही. एकमेकांपासून लागण होण्याचे प्रमाण याठिकाणी मोठे आहे. याला कारण जशी लोकसंख्येची घनता आहे, त्याचसोबत नियोजनातील त्रुटीही आहेत.

रेड झोनमध्ये नागरिकांनी घरीच बसून राहण्यासाठी त्यांना आवश्यक असणाऱ्या किमान सुविधाही आपण पुरवू शकलो नाहीत. उदाहरणच द्यायचे झाले तर ज्या भागात कोरोनाचे बाधित मोठ्या प्रमाणावर सापडत आहेत, त्या भागातील सार्वजनिक स्वच्छतागृहे संसर्ग वाढविणारी केंद्र बनली आहेत. एकाच स्वच्छतागृहांचा वापर जर शंभर ते दीडशे लोक करीत असतील आणि त्याच्या स्वच्छतेची, तिचा वापर करणाऱ्या व्यक्तींच्या स्वच्छतेची योग्य ती काळजी घेणारी व्यवस्था सध्या झोपडपट्ट्यांमध्ये उपलब्ध नसल्याची तक्रार आहे. त्यामुळे या विषयाकडे गांभीर्याने लक्ष द्यायला हवे.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा 

दुसरी महत्त्वाची बाब या भागात आरोग्य तपासणीची पथके वाढवावी लागतील. कोरोना चाचणीचे प्रमाणही वाढवावे लागेल. क्वारंटाइन सेंटर मध्ये ही नागरिकांना धोका वाढला आहे, ते येथील असुविधांमुळे. क्वारंटाइन सेंटर मध्ये नेल्यानंतर तेथे पाॅझिटिव्ह रुग्णांपासून इतरांना संसर्ग होत असल्याच्या तक्रारीही आल्या. 

महापालिकेवर सध्या ताण निश्चित आहे, ते त्यांच्या पद्धतीने कामही करीत आहेत, पण त्याला योग्य नियोजनाची जोड द्यावी लागेल. केवळ गर्दी झाली म्हणून लोक पालिकेच्या शाळा, मंगल कार्यालयात हलवून चालणार नाही, तर संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शास्त्रीय प्रयत्न करावे लागतील. 

पुण्यातील 13 क्षेत्रीय कार्यालयांच्या परिसरातील स्थिती गंभीर आहे. आता डॉक्टर, नर्सेस, पोलिस, भाजीपाला विक्रेते यांना लागण झाल्याच्या केसेस समोर येत आहेत, अशावेळी प्रत्येक पुणेकराची जबाबदारी वाढली आहे. दोन्ही लाॅकडाऊनच्या काळात अनेकांनी संयम बाळगला. पण काही थोड्या लोकांच्या बेफिकिरीचा फटका अवघ्या शहराला बसतो आहे, परदेशातून आल्याने संक्रमित झालेल्यांची संख्या अगदी पन्नाशीच्या घरात होती, पण त्यानंतर जे काही झाले त्याला आपण सर्वजण जबाबदार आहोत.

आता आपल्या हातात केवळ पंधरा दिवस आहेत. यात भाजीपाला, मटन-चिकन आणि वेगवेगळ्या स्वादिष्ट रेसिपीज् यांच्या प्रेमात न पडता स्वत:च्या जीवाच्या प्रेमात पडून शंभर टक्के लाॅकडाऊन पाळले तरच या परिस्थितीवर मात करणे शक्य होणार आहे. कारण आपली लढाई पोटाशीही आहे. लाॅकडाऊन अधिक वाढला तर ती कशी लढणार, हे आता आपल्यालाच ठरवावे लागेल.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com