

क्रीडांगण
आशियाई क्रीडा स्पर्धेचे वेध
- किशोर पेटकर
--------------------------------------------------
लीड
आशियाई स्पर्धेत २००२पासून देशाचा आलेख उंचावू लागला. सुवर्णपदकांमध्ये भारताला दुहेरी आकडा गाठणे शक्य होऊ लागले. दशकभरात जकार्ता-पालेमबंग व हांग् चौऊ येथे जिंकलेल्या पदकांची संख्या वाढली. तीन वर्षांपूर्वी भारताने आशियाई क्रीडा मैदानावरील बलाढ्य चीन, जपान व दक्षिण कोरिया या देशांनंतर चौथा क्रमांक पटकावला.
--------------------------------------------------
जपानमध्ये आइची-नागोया येथे १९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीत आशियाई क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत भारतीय क्रीडापटूंवर प्रकाशझोत असेल. स्पर्धेत भारताला किती पदके मिळतील याची उत्सुकता असेल. तीन वर्षांपूर्वी चीनमधील हांग् चौऊ येथे झालेल्या १९व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय क्रीडापटूंनी पदक तक्त्यात ऐतिहासिक झेप घेतली होती. तब्बल २८ सुवर्णांसह प्रथमच पदकांचे शतक पार केले होते. स्पर्धेच्या इतिहासातील ही भारताची सर्वोत्तम कामगिरी ठरली. २०१८मध्ये इंडोनेशियातील जकार्ता-पालेमबंग येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने १६ सुवर्णांसह एकूण ७० पदके जिंकून चुणूक दाखविली होती. कोविड-१९ महामारीत खेळाडूंच्या तयारीस फटका बसला, तरीही मागील आशियाई क्रीडा स्पर्धेत पदकांची संख्या कमालीची वाढली. खेळाडूंचा दृढनिश्चय आणि खडतर मेहनतीमुळे एकूण पदकांची संख्या १०६पर्यंत गेली. संघ निवडीत कठोरता आली. आशियाई पातळीवरील पहिल्या आठमध्ये असलेल्या खेळाडू आणि संघांनाच संधी देण्याचे धोरण केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयातर्फे राबविले जाते. आशियाई, ऑलिंपिक स्पर्धा केवळ मौजमजेसाठी ठरण्याचे दिवस आता संपले आहेत. पात्रता मिळविण्यासाठी क्रीडापटू जबरदस्त संघर्ष करताना दिसत असून, त्याद्वारे दर्जा उंचावल्याचे अगोदर जकार्ता-पालेमबंग येथे आणि नंतर हांग् चौऊ येथे दिसून आले. त्यामुळेच आइची-नागोया येथे भारतीय क्रीडापटू आणखी मोठी उंची गाठतील असा विश्वास क्रीडाक्षेत्रात व्यक्त होत आहे.
सुवर्णपदकांच्या संख्येत वाढ
सन १९५१मध्ये नवी दिल्लीत झालेल्या पहिल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत घरच्या मैदानावर भारताने १५ सुवर्णांसह एकूण ५१ पदके जिंकली होती. नंतर १९८२मध्ये पुन्हा नवी दिल्लीत झालेल्या स्पर्धेत १३ सुवर्णांसह ५७ पदके मिळाली होती. मात्र १९८६ ते १९९८ या कालावधीत झालेल्या चार आशियाई क्रीडा स्पर्धांत भारताची कामगिरी सुवर्णपदकांमध्ये प्रचंड खालावली. १९९०मध्ये बीजिंगमधील स्पर्धेत देशाला कबड्डीतील फक्त एका सुवर्णपदकावर समाधान मानावे लागले होते. आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताचा सहभाग चेष्टेचा विषय ठरत असताना २००२पासून देशाचा आलेख उंचावू लागला. सुवर्णपदकांत भारताला दुहेरी आकडा गाठणे शक्य होऊ लागले. दशकभरात जकार्ता-पालेमबंग व हांग् चौऊ येथे जिंकलेल्या पदकांची संख्या वाढली. तीन वर्षांपूर्वी भारताने आशियाई क्रीडा मैदानावरील बलाढ्य चीन, जपान व दक्षिण कोरिया या देशांनंतर चौथा क्रमांक पटकावला.
ॲथलेटिक्स, नेमबाजी, तिरंदाजीत दबदबा
सन २०२३मध्ये झालेल्या १९व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने ॲथलेटिक्स, नेमबाजी व तिरंदाजी या खेळांत सुवर्णपदकांमध्ये दबदबा राखला. नेमबाजीत सात सुवर्णांसह २२ पदके मिळाली. ॲथलेटिक्समध्ये सहा सुवर्णांसह सर्वाधिक २९ पदके भारतीयांनी प्राप्त केली, तर तिरंदाजीत पाच सुवर्णांसह एकूण नऊ पदके जिंकून भारताने उत्तम कामगिरी बजावली. कुस्ती व बॉक्सिंग या हमखास पदके मिळणाऱ्या खेळात भारताला सुवर्णपदक मिळाले नाही, तरीही अनुक्रमे सहा व चार पदके जिंकून पदक तक्त्यातील सुधारीत कामगिरीत वाटा उचलला. रोइंग या नौकानयन खेळात जिंकलेली पाच पदके लक्षणीय ठरली. स्क्वॉश, बॅडमिंटन, टेनिस या रॅकेट खेळांत, तसेच घोडेस्वारीतही भारतीयांच्या गळ्यात सोनेरी रंगाची पदके पडली. यंदाही कबड्डी, क्रिकेट, हॉकी या खेळात भारतीयांना सुवर्णाची ओढ असेल. २०२३मध्ये एकंदरीत भारतीयांनी २२ खेळांत पदके जिंकण्याचा पराक्रम साधला होता.
---------------------------------------------------------------------------------------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.