मार्केट यार्ड : "तोलणारांचा प्रश्न राज्य सरकारने प्रलंबित ठेवल्यामुळे उपोषण करणे अपरिहार्य झाले. आठ महिन्यांपूर्वी तोलणारांना कामावरून काढून टाकले. त्यामुळे त्यांची उपासमार सुरू आहे. तोलणारांना पुन्हा काम मिळावे, यासाठी उपोषण सुरू केले आहे,'' असे महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी सांगितले.
पुणे बाजार समितीच्या कार्यालयासमोर हमाल मापाडी महामंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत बुधवारपासून (ता. 18) बाबा आढाव यांनी बेमुदत उपोषणाला सुरवात केली. या वेळी महामंडळाचे सहचिटणीस हनुमंत बहिरट, कामगार युनियनचे सचिव संतोष नांगरे, गोरख मेंगडे यांच्यासह महामंडळाचे पदाधिकारी, हमाल, तोलणार उपस्थित होते.
आढाव म्हणाले, "तोलणारांच्या प्रश्नांबाबतचा अहवाल सुनील पवार समितीने तीन आठवड्यांपूर्वी सरकारला सादर केला. त्यानंतरही निर्णय झाला नाही. दोन तीन दिवसांत विधानसभा निवडणुकीची अचारसहिंता लागेल. त्यानंतर हा प्रश्न तसाच राहणार असल्याने उपोषणाचा निर्णय घेतला.''
हनुमंत बहिरट म्हणाले की, ''भुसार बाजारातील व्यापाऱ्यांनी ठरलेल्या अटीचे पालन केले नाही. अहवाल येईपर्यंत 50 किलोपेक्षा जास्त विक्री झालेल्या मालावर तोलाई देण्याचे ठरले होते. मात्र, दहा टक्केच व्यापारी तोलाई भरत आहेत. त्यामुळे तोलणारांना पुरेसा पगार मिळत नाही. त्यातून गुजराण होणेही अवघड बनले आहे. त्यामुळे निर्णय होईपर्यंत उपोषण सुरू राहील.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.