

जलप्रदूषण रोखण्यासाठी राज्यातील सर्व धरणांच्या पाणलोट क्षेत्राच्या दोन्ही बाजूस दोनशे मीटरच्या परिसरात कोणत्याही स्वरूपाचे बांधकाम करण्यास राज्य सरकारकडून बंदी घालण्यात आली आहे.
पुणे - जलप्रदूषण रोखण्यासाठी राज्यातील सर्व धरणांच्या पाणलोट क्षेत्राच्या दोन्ही बाजूस दोनशे मीटरच्या परिसरात कोणत्याही स्वरूपाचे बांधकाम करण्यास राज्य सरकारकडून बंदी घालण्यात आली आहे. त्याची अंमलबजावणी जलसंपदा विभागाकडून सुरू करण्यात आली असून या निर्णयामुळे आता धरणाच्या निसर्गरम्य परिसरात अनधिकृत अथवा परवानगी घेऊन फार्म्स हाऊस अथवा कोणत्या स्वरूपाचे बांधकाम करण्यावर नियंत्रण आले आहे.
पुणे जिल्ह्यासह राज्यातील धरणांच्या जवळ मोठ्या प्रमाणावर प्लॉट पाडून फार्म्स हाऊस उभारण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांपासून वाढीस लागले आहे. कोणतीही परवानगी न घेता हे फार्म्स हाऊस उभारून त्यांचे सांडपाणी धरणाच्या जलाशयात सोडले जाते. त्यातून जलप्रदुषणाचा धोका वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाने धरणांच्या पाणलोट क्षेत्राच्या दोन्ही बाजूस २०० मीटर अंतरापर्यंत कोणत्याही स्वरूपाचे बांधकाम करण्यास बंदी घालावी, त्यासाठी पूर्वीच्या नियमावलीत बदल करावा, असा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला होता. त्यास राज्य सरकारने नुकतीच मान्यता दिली असल्याचे जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता ह. वि. गुणाले यांनी सांगितले.
यापूर्वी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाण्याच्या पातळीवर म्हणजे १ मीटर उंच अथवा ७५ मीटरच्या परिसरात बांधकाम करण्यास बंदी होती. अनेकदा भराव टाकून ही उंची वाढून बांधकामे केली जात होती. त्यामध्ये नव्याने ही दुरुस्ती झाल्यामुळे आता २०० मीटरच्या परिसरात आणि पाणलोट क्षेत्राच्या अखेरच्या टोकापर्यंत बांधकामास बंदी आली आहे. तसेच अशी बांधकामे होणार नाही अथवा पाणलोट क्षेत्राच्या दोनशे मीटरच्या परिसरात बांधकामांना परवानगी देताना या नियमांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी त्या त्या धरणाच्या परिसरातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर सोपविण्यात आली आहे. तसेच अशी बांधकामे झाल्यास त्यांच्यावर कारवाई करून पाडण्याची जबाबदारी देखील अशा प्राधिकरणाशी राहील, असेही या आदेशात म्हटले आहे.
जलप्रदूषण रोखण्याबरोबरच धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील जैववैविध्य (बायोडार्व्हसिटी) टिकून राहण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. या नियमाची अंमलबाजणी तत्काळ लागू करण्यात आली असून पाणलोट क्षेत्राच्या दोन्ही बाजूस दोनशे मीटरच्या परिसरात आता बांधकाम करता येणार नाही. यातून धरणांचे काठ सुरक्षित राहतील आणि त्यांचे सुशोभीकरण करणे शक्य होणार आहे.
- ह.वि. गुणाले (मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग)
३ हजार ६१८ राज्यातील धरणांची संख्या
८२ मोठ्या धरणांची संख्या
२३७ मध्यम अकराच्या धरणांची संख्या
३ हजार २९९ लघू पाटबंधारे धरणांची संख्या
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.