बारामती पॅटर्न पोहचणार आता तेलंगणा राज्यातही, कारण...

बारामती पॅटर्न पोहचणार आता तेलंगणा राज्यातही, कारण...

माळेगाव : शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत एकरी अधिकाधिक उत्पादन घेवून जनतेची भूक तर भागवायची तर आहेच, परंतु यापुढे शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाच्या आधारे अधिकाधिक पैसे मिळण्यासाठी तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखाली काम सुरू आहे. या महत्वाकांक्षी कामाला अधिकाधिक बळकटी येण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, हरियाना राज्यातील शेतीचा अभ्यास करणे आमच्या दृष्टीने क्रमप्राप्त ठरले. त्याच उद्देशाने प्रथम महाराष्ट्रातील विशेषतः बारामतीमधील शेतीमधील आधुनिक तंत्रज्ञान पाहिले. येथील कृषी विज्ञान केंद्राच्या मध्यमातून हवामान अंदाज, कृषी व पशुसल्ला, शेतीविषयक माहिती, शेतमालाचे बाजारभाव, कृषी तज्ञांचे झालेले मार्गदर्शनाचा उपयोग आम्हाला तेलंगणाचा शेती हायटेक करण्यासाठी होऊ शकतो, असे प्रतिपादन तेलंगणाचे कृषी मंत्री एस. निरंजन रेड्डी यांनी केले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

बारामती अॅग्रीकल्चरल डेव्हलमेंट ट्रस्ट संचलित शारदानगर शैक्षणिक संकूल व कृषी विज्ञान केंद्रातील शेती व शेतीपुरक व्यवसायांची माहिती घेण्यासाठी आज तेलंगणा राज्याचे कृषी मंत्री एस. निरंजन रेड्डी यांचे सरकारी शिष्टमंडळ आले होते. यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते.

अॅग्रीकल्चरल डेव्हलमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार, मुख्य कार्य़कारी अधिकारी निलेश नलवडे, तेलंगणा सरकारचे सचिव बी. जनार्धन रेड्डी, फलोद्पादन व रेशीम विभागाचे संचालक एस. व्यंकटराम रेड्डी, सह संचालक उद्यान विद्या श्रीमती सरोजीदेवी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, तेलंगणा राज्याची भौगोलिक स्थिती आणि तेथील शेतीचे वास्तव चित्र कसे स्पष्ट कराल, असे विचारले असता मंत्री रेड्डी म्हणाले, ''भारतामध्ये सर्वाधिक शेती विकासाला चालना देणारे राज्य म्हणून तेलंगणाची ओळख आहे. येथील शेतीचा अधिकाधिक विकास होण्यासाठी आमचे सरकार प्रय़त्न करीत असते. अर्थात आमच्याकडे जमीन, हवामान चांगले आहे. कृष्णा व गोदावरी नदीचे पुरेसे पाणी आहे. त्यामुळे आमच्या राज्यात पुढील दीड वर्षात सुमारे सव्वाकोटी एकर क्षेत्र पाण्याखाली येणार आहे. त्यासाठी वेगवेगळे प्रोजेक्ट बनविले आहेत.

तेलंगणामध्ये २५ लाख बोरवेल असून, त्यासाठी पुर्णपणे वीज मोफत आहे. एक एकरापासून ते ५४ एकरापर्य़ंत शेतकऱ्यांना शेती खर्चासाठी वर्षाला १० हजार अनुदान दिले जाते. यंदा या योजनेसाठी १४ हजार कोटी रुपयांची तरतूद बजेटमध्ये केली आहे. त्यामुळे वीज, पाणी, खते आणि शेती खर्चाचे अनुदान हे सर्व देत असताना आता आधुनिक तंत्रज्ञान, यांत्रिकरण, शेतीमालाची निर्यात प्रक्रिया आदी बाबींना प्राधान्य देण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे.''

तेलंगणा राज्यात विशेषतः उद्यान (फळबाग व भाजीपाला) क्षेत्रात पाहिजे तेवढी प्रगती झाली नाही. या क्षेत्रात अधिक चांगले काम करणारे महाराष्ट्र राज्य आहे. त्यामध्ये पवार साहेबांचे योगदान अधिक आहे. याकामी बारामती कृषी विज्ञान केंद्रातील काम आणि पवार साहेबांचे योगदान पुर्णतः देशाला माहीत आहे.

बारामती हा तसा जीरायत भाग. शेतकऱ्यांच्या विकासासाठी अतिशय मेहनतीने येथे हिरवळ पहावयास मिळते. हीच गोष्ट पहावयास मिळाल्याने बारामतीचा दौरा सार्थकी ठरल्याचे आम्हाला वाटते, असा विश्वासही मंत्री रेड्डी यांनी व्यक्त केला.

दुसरीकडे, तेलंगणाच्या शिष्टमंडळाने बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या कार्य़क्षेत्रातील पशुपालन व दुग्ध व्यवसाय गुणवत्ता केंद्र, भाजीपाला गुणवत्ता केंद्र, विविध शेतामधील प्रयोग, जैविक खेते व औषधे उत्पादन प्रयोगशाळा, माती परिक्षण प्रयोगशाळा, हरीतगृहातील फुलशेती, मधुमक्षिका पालन आदी ठिकाणी भेटी दिल्याची माहिती रतन जाधव यांनी दिली. 

(संपादन : सागर डी. शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com