Railway : बारामती फलटण रेल्वेमार्गाचे काम पुढील महिन्यापासून होणार सुरु

बारामती फलटण लोणंद या रेल्वेमार्गाला रेल्वे विभागाने सन 1997-1998 च्या रेल्वे अर्थसंकल्पातच मंजूरी दिली होती.
Railway
RailwaySakal

बारामती - पंचक्रोशीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या बारामती फलटण रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाचे काम पूर्ण झाले असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी दिली. डिसेंबर 2025 पर्यंत मातीकाम व पूलांचे काम पूर्ण करण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे. तब्बल 1850 कोटी रुपयांचा हा संपूर्ण प्रकल्प आहे.

बारामती फलटण लोणंद या रेल्वे मार्गाच्या कामाची प्रक्रीया सुरु झाली आहे. या पैकी फलटण लोणंद हा रेल्वे मार्ग पूर्ण झालेला आहे. बारामती फलटण या रेल्वेमार्गाच्या भूसंपादनासाठी 24 वर्षांचा कालावधी उलटल्यानंतर ही प्रक्रीया अखेर पूर्णत्वास गेली आहे.

बारामती फलटण लोणंद या रेल्वेमार्गाला रेल्वे विभागाने सन 1997-1998 च्या रेल्वे अर्थसंकल्पातच मंजूरी दिली होती. प्रत्यक्षात या रेल्वे मार्गासाठीचे भूसंपादन सुरु व्हायला वीस वर्षांचा काळ निघून गेला. फलटण लोणंद हे भूसंपादन होऊन तेथे रेल्वे मार्गही अस्तित्वात आला. बारामती फलटण हे भूसंपादन रखडले होते.

आता मात्र रेल्वेच्या नियमानुसार ब-यापैकी भूसंपादन संपलेले असून उर्वरित भूसंपादन वेगाने करण्याचा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख व उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांचा प्रयत्न आहे.

बारामती तालुक्यातील 179 हेक्टर जमिनीचे संपादन या रेल्वेमार्गासाठी करण्यात आले असून खरेदीखताने 149.46 हेक्टर, निवाड्यानुसार 29.56 हेक्टर व कब्जेपट्टीने 5.678 हेक्टर क्षेत्राचे भूसंपादन केल्याची माहिती वैभव नावडकर यांनी दिली.

या पैकी जवळपास 90 टक्के जागा प्रत्यक्ष ताब्यात आली असून उर्वरित दहा टक्के जागाही येत्या काही दिवसात ताब्यात घेऊन ती रेल्वे विभागाकडे सुपूर्द केली जाणार आहे. या भूसंपादनापोटी आजपर्यंत तब्बल 244 कोटी 85 लाख रुपयांचे वाटप झाले आहे. रेल्वेने या भूसंपादनासाठी 281 कोटी 41 लाख रुपये जिल्हाधिका-यांकडे जमा केलेले आहेत.

610 कोटींच्या निविदा प्रसिध्द....

या 38कि.मी. मार्गासाठी मातीकाम व पूलांसाठी मिळून रेल्वेने 610 कोटी रुपयांचे काम संबंधित एजन्सीला देऊ केले असून फेब्रुवारी मध्ये हे काम फलटण व बारामती दोन्ही बाजूंनी सुरु होणार आहे.

दिरंगाईमुळे 75 कोटींचा प्रकल्प 1850 कोटींवर....

1997 मध्ये या रेल्वेमार्गास मंजूरी मिळाली होती. तेव्हा या प्रकल्पाची किंमत 75 कोटी रुपये इतकी होती. आज याच रेल्वेमार्गासाठी तब्बल 1850 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा रेल्वे मार्ग वेळेत झाला असता तर रेल्वेची किमान दोन हजार कोटी रुपयांची बचत झाली असती. डिझेल, वेळ व इतर राष्ट्रीय संपत्तीचे झालेले नुकसान वेगळेच आहे.

वेळ वाचणार..अंतर कमी होणार....

मिरजहून मालगाडी पुणे, दौंड मार्गे मनमाडच्या दिशेने जाते. बारामती फलटण लोणंद मिरज रेल्वे मार्ग झाल्यानंतर मिरजहून बारामती दौंड मार्गे गाडी मनमाडकडे जाईल. याने पुणे रेल्वे स्थानकावरील ताण कमी होईल, वेळ व अंतर यांची बचत होऊन रेल्वेचा दरवर्षी कोट्यवधींचा खर्च कमी होणार आहे.

दृष्टीक्षेपात प्रकल्प.....

  • न्यू बारामती, माळवाडी व ढाकाळे ही तीन नवीन रेल्वे स्थानके

  • 13 छोटे, 9 आरओबी व 19 अंडरपास केले जाणार

  • नीरा नदीवर सर्वात मोठा पूल उभारला जाणार

  • पहिल्या टप्प्यात अर्थवर्क व पूलांचे काम पूर्ण केले जाणार

  • हा मार्ग विद्युतीकरणासह पूर्ण केला जाणार.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com