तडीपारी करुन गुन्हेगारी मोडीत काढू; उपायुक्त पंकज देशमुखांचा इशारा 

तडीपारी करुन गुन्हेगारी मोडीत काढू; उपायुक्त पंकज देशमुखांचा इशारा 
Updated on

केसनंद : लोणीकंद पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात यापुढे शहराप्रमाणेच सामान्य जनतेला न्याय देणाऱ्या सक्षम कायदा सुव्यवस्थेद्वारे चांगले पोलिसिंग केले जाणार असून हितसंबंधातून चालणारे अवैध व्यवसाय, दबावतंत्रातून चालणारी ठेकेदारी, गावगुंडगिरी, खंडणीखोरी सारखी गुन्हेगारी प्रसंगी तडीपारी सारखी कडक कारवाई करुन मोडीत काढू, असा सणसणीत सुचक इशारा पोलिस उपायुक्त पंकज देशमुख यांनी पहिल्याच बैठकीत दिल्याने गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.

लोणीकंद व लोणी काळभोर पोलिस ठाण्यांच्या शहर पोलिस दलात समावेशानंतर वाघोली येथे आमदार अशोक पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या पहिल्याच आढावा बैठकीत पोलिस उपायुक्त पंकज देशमुख बोलत होते. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले, ‘लोणीकंद पोलिस ठाण्याच्या शहर पोलिस दलात समावेशानंतर आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पहील्याच दिवशी भेट देवून येथेही शहराप्रमाणेच कामकाजाचे आश्वासन दिले आहे. त्यानुसार कार्यवाही तातडीने केली जाईल. यामध्ये सक्षम वाहतूक शाखेसह लोणीकंद पोलिस ठाण्याचा स्टाफ १०० पर्यंत वाढवला जाईल. तसेच वाघोलीसाठी स्वतंत्र पोलिस ठाणेही लवकरच कार्यान्वित केले जाईल. गरजेनुसार पोलीस चौक्यांची संख्याही वाढवून नागरिकांच्या तक्रारीची त्वरीत दखल घेतली जाईल. तसेच आधुनिक सिसीटीव्ही यंत्रणा, अवैधपणे तोडलेले दुभाजक जोडणे, वडगाव शिंदे गाव लोहगावला तर व मांजरी गावही नागरीकांच्या सोयीनुसार वाघोलीला जोडण्यासह विविध उपाययोजना  केल्या जातील. मात्र पोलिस यंत्रणेवर कोणत्याही प्रकारचा दबाव सहन केला जाणार नाही, तसेच पुराव्यासह विधायक टिकेव्यतिरिक्त सोशल मिडीयाचा चुकीचा वापरही खपवून घेतला जाणार नाही, असाही इशारा त्यांनी दिला.

आमदार ॲड. अशोक पवार म्हणाले, ‘वाघोलीसारख्या मोठ्या लोकसंख्येच्या गावात पोलिस तसेच महसुल यंत्रणेवर मोठा ताण आहे. येथील जनतेच्या सोयीसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून विभागभार यंत्रणा उभारणे तसेच वाहतुक नियोजनासाठी १६ पदरी मार्गासह दुमजली उड्डाण पुलाच्या उभारणी सारखे प्रकल्प राबविण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे. वाघोली, लोणीकंद साठी स्वतंत्र पोलिस ठाणे व शहर पोलिस दलाची वाढीव यंत्रणा हे नागरी विकासाचे प्रतिक आहे. यापुढे नागरिकांना शहराप्रमाणेच उत्तम कायदा सुव्यवस्था मिळेल, ही समाधानाची बाब आहे. तर यापुढे गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी भाडेकरुंची ऑनलाईन नोंद तसेच कोरोनाच्या पार्श्वभुमीवर मास्क न वापरणे, शासकीय नियम आणि वाहतुक शिस्त मोडणे यासारख्या गुन्ह्यांवरही त्वरीत कारवाई सुरु करणार असल्याचे सहाय्यक आयुक्त किशोर जाधव यांनी स्पष्ट केले. 

याप्रसंगी सहाय्यक आयुक्त किशोर जाधव, तसेच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदिप कंद, माजी सदस्य डॉ.चंद्रकांत कोलते, रामदास दाभाडे, सौ. अर्चना कटके, माजी सभापती रोहिदास उंद्रे, शिवदास उबाळे, दादासाहेब सातव पाटील, राजेंद्र सातव पाटील, प्रबोधन केंद्र प्रमुख उत्तमराव भोंडवे, निवृत्त अधिकारी जानमहम्मद पठाण, डि. एम.झुरुंगे, शांताराम कटके, माहिती सेवा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत वारघडे, बाळासाहेब सातव, कृष्णकांत सातव, सरपंच वसुंधरा उबाळे, उपसरपंच महेंद्र भाडळे, सरपंच दिपक गावडे, रविंद्र वाळके, गणेश पुजारी, युवक अध्यक्ष योगेश शितोळे, राष्ट्रवादीच्या महिलाध्यक्षा लोचन शिवले, आव्हाळवाडीच्या सरपंच सौ. मंदाकीनी आव्हाळे, वाघोली हौसिंग सोसायटीचे अध्यक्ष संजीव कुमार पाटील आदींसह अनेक उपस्थित मान्यवरांनी यावेळी विविध सुचनाही मांडल्या. 

यामध्ये कायदा सुव्यवस्था, नेहमीची वाहतुक कोंडी, पावसाळ्यात रस्त्यावर येणारे पाण्यामुळे होणारी वाहतुक कोंडी, तुळापूर येथे पुर्णवेळ पोलीस कर्मचारी देणे, डिपी चोऱ्या, भावकीतील भांडणे, गावपातळीवर वाद मिटवणे, भाडेकरुंची नोंद, तोडलेले दुभाजक जोडावेत, वाडेबोल्हाई येथे चौकी अथवा औटपोस्ट व्हावे, गुन्हेगारीवर नियंत्रण रहावे, कर्मचारी वाढवावेत, पोलिसांची निवास व्यवस्था, शेतमाल वाहतुकीत सहकार्य व्हावे तसेच ऑनलाईन तक्रारीची दखल घेतली जावी, सोसायट्यांत सेवा पुरवठादारांचे दबावतंत्र, वाघोलीत वाईन शॉपी रस्त्यालगत नको, तसेच वाघोलीत पोलिस ठाण्याची इमारत व्हावी यासह विविध विषयांवर मान्यवरांनी सुचना व मते मांडली. लोणीकंदचे पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांनी प्रास्ताविक केले. तर सरपंच वसुंधरा उबाळे यांनी स्वागत केले तर उपसरपंच महेंद्र भाडळे यांनी आभार मानले. 

मिली जुली सरकार नही चलेगी- यावेळी बोलताना उपायुक्त देशमुख यांनी पुर्वीप्रमाणे स्थानिक कारभारी, गावगुंड, गुन्हेगार तसेच राजकारणातील चुकीच्या प्रवृत्ती यांचे स्थानिक पोलिसांशी हितसंबंध राखून चालणारा मिली जुली सरकार प्रमाणे कारभार यापुढे आता चालणार नसल्याचा संदेश देत यापुढे प्रत्येक गुन्ह्यांवर कायदेशीर कठोर कारवाई होईल, असा संकेत दिल्याने या सर्वांचेच धाबे दाणाणले आहेत. 

नव्याने होणार हे बदल ... 
१) लोणीकंद पोलिस ठाण्यांचा सध्याचा ३९ जणांचा स्टाफ १५ जण वाढवून ५४ केला असून लवकरच तो १०० पर्यंत होईल.
२) भौगोलिक गरजेनुसार वाडेबोल्हाई, अष्टापुरफाटा सारख्या ठिकाणी ३ ते ४ पोलीस चौक्यांची निर्मिती 
३) येत्या महीन्याभरात वाघोली स्वतंत्र पोलीस ठाणे म्हणून अस्तित्वात आणण्याची कार्यवाही होईल. नवी इमारतही होणार. 
४) गुन्हेगारी रोखण्यांसाठी शहरांप्रमाणेच सिसीटीव्ही यंत्रणांचे जाळे विस्तारणार
५) वडगाव शिंदे गाव लोहगावला तर मांजणी वाघोलीला जोडणार
६) वाढते अपघात रोखण्यासाठी अवैध दुभाजक तोडणे थांबवणार
७) वाहतुक शाखा अधिक सक्षम करणार
८) सामान्य नागरीकांच्या पात्र सुचनांची योग्य दखल घेतली जाईल, त्यासाठी या भागातही १०० क्रमांकाची तातडीची सेवा सुरु करणार.
९) भाडेकरुंची ऑनलाईन नोंद
१०) मास्क न वापरणे, व तत्सम शासकीय नियम माेडणे तसेच वाहतुक शिस्त मोडणे यासरख्या गुन्ह्यांवर त्वरीत कारवाई सुरु करणार. 

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com