‘लुटेरी बहू’ शुभमंगल...सावधान!

‘लुटेरी बहू’ शुभमंगल...सावधान!
Updated on

मंचर : मुलाचे आई, वडील व कुटुंबीय मनापासून आपल्या मुलाच्या लग्नाची व नवीन सून घरात आणायची स्वप्न पाहत असतात. पण, सगळ्यांनाच याचा चांगला अनुभव येतो, असे नाही. आंबेगाव तालुक्यातील भराडी येथे घडलेली घटना धक्कादायक आहे. वधूने व मध्यस्थी यांनी असा काही प्रकार केला की, वर पक्षाला पश्चात्ताप करण्याची वेळ आली आहे. लग्नापूर्वी मध्यस्थीने दीड लाख रुपये व लग्नानंतर वधूने आठ दिवसानंतर पाच तोळे सोन्याचे दागिने घेऊन पळ काढला आहे.
याबाबत एकूण सहा जणांकडून फसवणूक झाल्याची फिर्याद नवरदेव नितीन कांताराम कुरकुटे (वय ३२, रा. भराडी) यांनी मंचर पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार याप्रकरणी वधू लक्ष्मी मच्छिंद्र चव्हाण, मावशी कमल नामदेव जाधव, काका नामदेव जाधव, मामा महादेव लक्ष्मण चिंचवाड व काळे (पूर्ण नाव माहीत नाही; सर्व रा. शिंगणापूर, जि. परभणी), नवनाथ महादेव गवारी (रा. गवारीमळा- मेंगडेवाडी, ता. आंबेगाव) यांच्यावर संगनमताने कट करून फसवणूक केल्याचा गुन्हा मंचर पोलिसांनी दाखल केला आहे.

नवनाथ गवारी याने स्थळ सुचविले. त्यासाठी दीड लाख रुपये रक्कम त्याने कुरकुटे यांच्याकडून घेतली. शिंगणापूर येथे लक्ष्मी चव्हाण हिचे स्थळ १४ फेब्रुवारी रोजी दाखवले. त्यावेळी गवारी, कमल जाधव, महादेव चिंचवाड व काळे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. गरीब असल्याने लग्न करत आहोत, असा विश्वास देऊन, ‘तुम्ही उद्याच्या उद्या लग्न करून घ्या,’ असे मुलीच्या नातेवाइकांनी सांगितले. पाच तोळे सोन्याचे दागिने बनविले. १५ फेब्रुवारी रोजी घरासमोर भराडी येथे लग्न झाल्यानंतर मुलीचे नातेवाईक निघून गेले.

वधू लक्ष्मी ही भराडी येथे सात दिवस मुक्कामी थांबल्यानंतर, ‘मावशी कमल खूप आजारी आहे,’ असे सांगून पाच तोळे सोन्याचे दागिने अंगावर घालून शिंगणापूर येथे निघून गेली. मात्र, दहा दिवस झाले तरी ती परत आली नाही. त्यामुळे शिंगणापूर येथे नितीन कुरकुटे गेले. त्यावेळी समजले की, घर एक दिवसासाठी भाड्याने घेतले होते. तसेच, लक्ष्मी व गवारी यांच्याशी वारंवार संपर्क केला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे फसवणूक झाल्याचे कुरकुटे यांच्या लक्षात आले.
आरोपींच्या शोधासाठी पोलिस नाईक अजित मडके यांच्यासह पथक परभणीला रवाना केले जाईल, असे मंचरचे पोलिस निरीक्षक सुधाकर कोरे यांनी सांगितले.

बनावट विवाह करून लुटणारे मोठे रॅकेट सध्या बीड, लातूर, जालना, परभणी व कर्नाटक सीमेवर आहे. सध्या रोज अशा दोन ते चार घटना उघडकीस येत आहेत. याबाबत तरुणांनी व त्यांच्या कुटुंबाने सजग राहणे आवश्यक आहे. आंबेगाव तालुक्यात अशा स्वरूपाच्या १५ घटना घडलेल्या आहेत. त्याचा फटका नवरदेव व त्याच्या कुटुंबीयांना बसत असतो. प्रतिष्ठेमुळे व आपली समाजात चर्चा होईल, या भीतीमुळे कोणीही पोलिसांकडे तक्रार देण्यास पुढे येत नाही. फसवणूक झालेल्यांनी न घाबरता मंचर पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा.-सुधाकर कोरे, पोलिस निरीक्षक, मंचर 

१५ जणांची फसवणूक- 1)बीड, लातूर, जालना, परभणी व कर्नाटक सीमेवर मोठे रॅकेट.
2)राज्यात दररोज दोन ते चार घटना घडतात.
3)आंबेगाव तालुक्यात दीड वर्षात १५ जणांची फसवणूक.
4)पुणे जिल्ह्यात अशा पद्धतीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ

(संपादन : सागर डी. शेलार) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com