बारामती व इंदापुरातील शेतीसाठी आनंदाची बातमी...

water
water

वालचंदनगर / शेटफळगढे (पुणे) : नीरा डावा कालव्यातून इंदापूर व बारामती तालुक्‍यातील शेतकऱ्यांसाठी रब्बीच्या हंगामातील दुसऱ्या आवर्तनास सुरुवात झाली आहे. तसेच, खडकवासला कालव्याद्वारे शेतीसिंचनासाठी सोडण्यात आलेले रब्बी हंगामातील पहिले आवर्तन गुरुवारी दुपारी इंदापूर तालुक्‍याच्या सुरुवातीच्या अर्थात शेटफळगढे परिसरात पोचले. 

नीरा डावा कालव्याच्या माध्यमातून इंदापूर व बारामती तालुक्‍यातील शेतकऱ्यांसाठी "टेल टू हेड' पद्धतीने रब्बीच्या दुसऱ्या आवर्तनास सुरुवात झाली आहे. 15 डिसेंबर रोजी वीर धरणातून सिंचनासाठी सोडलेले पाणी इंदापूर तालुक्‍यात आले आहे. रब्बीच्या हंगामासाठी पाटबंधारे विभागाने 3 टीएमसी पाण्याची तरतूद केली आहे. सध्या नीरा खोऱ्यातील धरणक्षेत्रामध्ये शंभर टक्के पाणीसाठा आहे. या पाण्याचा उपयोग शेतकऱ्यांना होणार आहे. रब्बीच्या हंगामातील सर्व पिकांना पाणी देण्यात येणार आहे. 

इंदापूर व बारामती तालुक्‍यामध्ये परतीचा पाऊस चांगला झाला. सध्या शेतकऱ्यांना पाण्याची उपलब्धता आहे. रब्बीच्या हंगामामध्ये शेतकऱ्यांनी कालव्याच्या पाण्याचा काटकसरीने वापर करावा. या हंगामामध्ये वाचविलेले पाणी उन्हाळ्यात मिळणार आहे. त्यामुळे कालव्याचे पाणी जपून वापरावे, असे आवाहन बारामतीचे पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता अजित जमदाडे यांनी केले. 

खडकवासल्याचे आवर्तन शेटफळगढे येथे पोचले 
शेटफळगढे (पुणे) : खडकवासला कालव्याद्वारे शेतीसिंचनासाठी सोडण्यात आलेले रब्बी हंगामातील पहिले आवर्तन गुरुवारी दुपारी इंदापूर तालुक्‍याच्या सुरुवातीच्या अर्थात शेटफळगढे परिसरात पोचले. 

सध्या रब्बी हंगामातील पिकांचा उत्पादनवाढीचा काळ सुरू असल्याने या पिकांना सिंचनासाठी सध्या पाण्याची आवश्‍यकता होती. अशातच ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीत लागण केलेल्या उसाच्या पिकांनाही सध्या पाण्याची आवश्‍यकता होती. त्यामुळे खडकवासला कालव्याद्वारे आवर्तन सोडण्यात यावे, अशी मागणी या कालव्यावर अवलंबून असलेल्या इंदापूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांमधून होत होती. अखेरीस शेतकऱ्यांची मागणी विचारात घेऊन जलसंपदा विभागाने 15 डिसेंबरपासून खडकवासला कालव्याला शेतीसिंचनासाठी आवर्तन सोडले आहे. हे आवर्तन इंदापूर तालुक्‍याच्या शेटफळगढे परिसरात गुरुवारी दुपारी पोचले.

नेहमीच्या आवर्तनाप्रमाणे कालव्यात पूर्ण क्षमतेने पाणी वाहण्यास आणखी तीन ते चार दिवसांचा कालावधी लागणार आहे. मात्र, शेती सिंचनाच्या गरजेच्या वेळी हे आवर्तन आल्याने शेतकरी बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com