पुणे : जिल्ह्यात गुरुवारी 391 लसीकरण केंद्रांवर एकूण 55 हजार 539 जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. असे असले तरी लसींचा साठा संपल्यामुळे हजारो नागरिकांना परत जावे लागले. ही अत्यंत निराशाजनक बाब असल्याचे सांगत केंद्र सरकारने तातडीने लसींचा पुरेसा साठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे सुळे यांनी ही मागणी केली आहे. लसच उपलब्ध नसल्यामुळे जिल्ह्यातील 109 लसीकरण केंद्रे आज बंद करावी लागली आहेत. लसीच्या पुरेशा साठ्याअभावी संबंधित केंद्रांवरील डॉक्टर्स आणि एकूणच आरोग्य यंत्रणा हतबल आहे. हे निराशावादी चित्र बदलण्यासाठी तातडीने प्रयत्न होण्याची गरज आहे.
कोरोना साथीच्या संसर्गाची साखळी तुटून सर्वसामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन पूर्वपदावर येणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील जनजीवन निर्धोकपणे आणि सुरळीत चालू होणे गरजेचे आहे. त्याशिवाय नागरिकांना त्यांच्या पायावर उभे राहणे शक्य होणार नाही. त्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांना लस देण्याचा दृढनिश्चय करावा लागेल. त्यासाठी तातडीने पुरेसा लस साठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी खासदार सुळे यांनी केली आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.