शहरातील पदपथ कोणासाठी?

Footpath
Footpath

पिंपरी-चिंचवड शहर तुफान वेगाने वाढते आहे. एका सर्वेक्षणानुसार हा वेग सुमारे ७० टक्के आहे. दहा वर्षांपूर्वी १७ लाख लोकसंख्या होती ती आज २७ लाखांच्या दरम्यान आहे. नागरिकांचे सुदैव म्हणजे एक बेशिस्त वगळता या नगरीला अगदी कशाकशाचीही कमी नाही. मुबलक पाणी, प्रशस्त रस्ते, पूल, उड्डाण पूल, शाळा, दवाखाने, उद्याने, मंडई, मैदाने, जलतरण तलाव अशा सर्व सुखसुविधा आहेत. 

शहराची वाटचाल आता महानगराच्या दिशेने सुरू आहे. शहरातील बहुतांश रस्त्यालगत प्रशस्त पदपथ आहेत. मात्र सर्वसामान्य नागरिकांना एका गोष्टीची तीव्र खंत आहे, ती म्हणजे ९० टक्के पदपथांचा ताबा हातगाडी, टपरी, पथारीवाल्यांनी घेतला आहे. त्यांना जाब विचारायची सोय नाही.

परिणामी, ज्यांचा प्रथम हक्क आहे तो पादचारी जीव मुठीत घेऊन रस्त्यावरून चालतो. पदपथ पादचाऱ्यांसाठी की अतिक्रमणांसाठी, हा खरा प्रश्‍न आहे. संतप्त पादचारी म्हणू लागलेत, ठीक आहे पादचाऱ्यांना पदपथ वापरता येत नसतील तर मग ते काढून टाका. कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेले पदपथांवर अशी अतिक्रमणे होणार असतील तर ते न बांधलेले बरे. पालिका प्रशासनाने कठोर कारवाई करून सर्व पदपथ तत्काळ अतिक्रमणमुक्त केले पाहिजे, तर तिथे ते नांगी टाकतात. त्यामुळे आयुक्त महोदय आता तुम्हीच एकदा स्पष्ट करा की, हे पदपथ नेमके कोणासाठी?

नगरसेवकांचा आशीर्वाद
शहरातील पदपथांबाबत रोज दैनिकांत छापून येते. हजारोवर नागरिक तक्रार करतात. महापालिकेची ‘सारथी’ हेल्पलाइन ‘हेल्पलेस’ आहे. तिथे केलेल्या तक्रारी परस्पर निकाली दाखवल्या जातात. लोक तिथे तक्रार करायला राजी नसतात. ७० टक्के ओघ कमी झाला आहे. एकप्रकारे हे पालिका प्रशासनाचे अपयश आहे. शहरात पाच वर्षांपूर्वी सुमारे साडेपाच हजार पथारीवाले होते. नव्याने केलेल्या सर्वेक्षणात तो आकडा आता दहा हजारांच्यावर गेला आहे. कारण काही भ्रष्ट अधिकारी, काही भिकार नगरसेवकांचा पदपथांवर टपरी, हातगाडी, पथारी, मोठी पत्राशेड दुकाने बांधून देणे हा एक गोरख धंदा झाला आहे. 

भोसरी परिसरात अतिक्रमणापासून दरमहा मिळणारा ‘मलिदा’ काही लाखांत आहे. प्राधिकरणातील टिळक चौक, भक्ती-शक्ती चौक, भेळ चौक, आकुर्डी रेल्वे स्टेशन परिसरातील पदपथांवरील अतिक्रमणांना नगरसेवकांचा आशीर्वाद आहे. वाल्हेकरवाडी, रावेत, स्पाईन रस्ता या भागातील एक नगरसेवक दुचाकीवर फिरून स्वतः टपऱ्यांचे भाडे (हप्ते) गोळा करतो.

महिना तीन ते पाच हजार असे एका टपरीचे भाडे आहे. केवळ एका नगरसेवकाच्या पाठिंब्याने पदपथांवर सुमारे पाऊनशेवर टपऱ्या राजरोस धंदा करतात. अधिकाऱ्यांना खूष करून वाकड आणि थेरगावला भर चौकात, रस्त्यावर सर्व पदपथांवर मंडई चालते. पिंपळे सौदागरच्या पदपथांबाबत हाउसिंग फेडरेशनसह अनेक सुजाण नागरिकांनी गाऱ्हाणे केले, परिणाम शून्य. कारण कारवाईच्या अगोदर रस्ता ‘ओके’ असतो. 

वाकड दत्त मंदिर रस्त्याला आणि पदपथांना बकालपणा आला आहे. चिंचवडच्या चापेकर चौकातील पदपथ आणि रस्ता दुभाजकांवरसुद्धा विक्रेत्यांचाच कब्जा असतो. 

भर चौकात पदपथावर वडापाव, फळ, दूध विक्रेत्यांच्या हातगाड्या दिवसभर ठाण मांडून बसतात. लोकांना धड रस्त्यावरूनसुद्धा चालता येत नाही. कारण काही गुंडांची हप्तेखोरी. प्राधिकरणातील उच्चभ्रू मंडळींनी ‘हे कुठवर चालायचे,’ असा रोकडा प्रश्‍न केला आहे. कोणीही एकत नसल्याने पालिका प्रशासन, पोलिसांना चपराक म्हणून त्यांनी आता ‘अतिक्रमणमुक्त प्राधिकरण,’ अशी एक व्हॉट्‌सॲप चळवळ सुरू केली आहे. आज हे शहराचे सार्वत्रिक चित्र आहे. आता त्यातल्या ‘अर्थकारणा’ची भलावणा करायची, की सामान्य पादचाऱ्यांचे हित महत्त्वाचे समजायचे ते प्रशासनाने कृतीतून दाखवून द्यावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com