alandi.
alandi.

आळंदीच्या वेशीवर कोरोना, आतातरी रस्त्यावरील मंडई हटवा 

आळंदी (पुणे) : साहेब, तेवढं रस्त्यावरच्या भाजीमंडईचा निर्णय घ्या. सध्या आळंदीच्या वेशीवर कोरोना आलाय, पण या रस्त्यावरच्या भाजी मंडईमुळे शहरातही कोरोनाची लागण व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे रस्त्यावरच्या भाजीविक्रेत्यांना शाळांची मैदाने आणि वाहनतळाच्या जागेत हलवा, अशी मागणी आळंदीकरांनी पालिका प्रशासनाकडे केली. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आळंदी पालिकेने रस्त्याच्या पदपथावर भाजी विकण्यास परवानगी दिली. परवानगी चाळीस लोकांना दिली, पण प्रत्यक्षात दीडशेहून अधिक भाजी आणि फळविक्रेते व्यवसाय करत आहेत. त्यात सर्वच आळंदीकर आहेत, असे नाही. कोणीही कधी व्यवसाय करण्यासाठी रस्त्यावर ठाण मांडून असल्याचे चित्र आहे. याशिवाय मोशी, चऱ्होली, भोसरी भागातील लोकही पथारी मांडून व्यवसाय करत आहे. शेजारी शेजारी खेटूनच भाजी विक्रीचा व्यवसाय करत आहेत. शहरातील प्रदक्षिणा रस्ता, पालिका कार्यालय, पोलिस चौकी, वडगाव रस्ता, मरकळ रस्त्यावर विक्रेत्यांची अधिक गर्दी आहे. 

तसेच, मोशीतून रात्री भाज्यांची खरेदी केली जात आहे आणि सकाळी आळंदीत मालाची विक्री करत आहे. भाजी विक्रेते कोणतेच सोशल डिस्टन्सिंग पाळत नाहीत. हातमोजे घालत नाही. सॅनिटायझरचा वापरही करत नाही. जिवाची जोखीम पत्करून व्यवसाय करत आहे. पालिका प्रशासन यावर ठोस कारवाई करत नाही. दोन दिवस पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पहाटेपासूनच भाजीविक्रेत्यांचा माल जप्त केला. मात्र, जप्तीची कारवाई केली तरी विक्रेते काही ऐकेनात. आजही रस्त्यावरचा बाजार सुरूच आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

आळंदीत सध्या एकही कोरोनाचा रुग्ण नाही. मात्र, आळंदीच्या सीमा अद्याप बंद केल्या नाहीत. त्यामुळे कोणीही आळंदीत सहजासहजी चकरा मारून येजा करत आहे. आळंदीत कोरोनाबाबत फारसे गांभीर्य नसल्याने कोरोनाची बाधा कोणालाही आणि कधीही होऊ शकते. त्यामुळे आळंदीकर सध्या रस्त्यावरचा बाजार बंद करून अन्य ठिकाणी हलविण्याची मागणी करत आहे. शहरातील वाहनतळे, शाळांची मैदाने व नदीपलीकडे देहू फाट्यावरील नवीन एसटी स्थानकाच्या जागेत भाजी आणि फळ विक्रेत्यांना परवानगी देण्याची मागणी होत आहे. याचबरोबर इंद्रायणी नदीवरील दगडी घाटावरही तात्पुरत्या स्वरूपात तीराच्या दोन्ही बाजूने भाजी मंडई भरवली, तरी सुरक्षित असणार आहे, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. 

आठवड्यातून दोनदा बाजार हवा 
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संचारबंदी लागू झाल्यानंतर शहरात दररोज भाजी खरेदी विक्री होते. त्यावर बंधन निश्‍चित आले पाहिजे. मोशी, चऱ्होलीत कोरोनामुळे नागरिक भयभीत आहे. दोन्ही गावे आळंदीला लागून आहेत. त्यामुळे आळंदीकरांची सुरक्षितता महत्त्वाची समजून प्रशासनाने आठवड्यातून दोन वेळा भाजी बाजार भरवणे गरजेचे आहे. त्यामुळे विक्रेत्यांचा रोजगार बुडणार नाही आणि सुरक्षित आणि प्रशस्त जागेत मंडई भरली जाईल. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com