

सुधारित
-------------
कापूस लागवडीकडे कल,
पण अधिकृत बियाणे विक्रीची चिंता
ॲग्रोवन वृत्तसेवा
अकोला : जिल्ह्यात आगामी खरीप हंगामात कपाशी लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढण्याची शक्यता वर्तविली जात असून कृषी विभाग त्यानुसार नियोजन करीत आहे. यंदा सुमारे एक लाख ४५ हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर कापूस बियाण्यांची मागणीही वाढण्याची शक्यता असून बियाणे कंपन्यांसाठी ही मोठी संधी मानली जात आहे. मात्र दुसरीकडे एचटीबीटी कापूस बियाण्यांचा संभाव्य शिरकाव किती राहील ही चिंता वाढविणारी बाब आहे. गेल्या हंगामात खारपाण पट्ट्यात या बीटी वाणांची मोठ्या प्रमाणात लागवड झालेली होती.
यावर्षी नियोजित क्षेत्रासाठी सुमारे सात लाख बियाण्यांच्या पाकिटांची आवश्यकता भासणार आहे. प्रशासनाने विविध कंपन्यांकडून सुमारे १२ लाखांवर पाकिटांची उपलब्धता करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यापैकी लाखभर पाकिटांचा पुरवठा झाल्याची माहिती कृषी खात्याकडून देण्यात आली. जिल्ह्यात काही कंपन्यांच्या विशिष्ट वाणांना आजवर मागणी राहिलेली आहे. गेल्या हंगामात यासाठी रांगा सुद्धा लागल्याचे दिसून आले.
असे असले तरी बहुतांश वाणांना तेवढी मागणी राहत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे काही मोजक्या कंपन्यांच्या बियाण्यांचीच गेल्या वेळी विक्री झाली होती. अनेक कंपन्यांचा साठा शिल्लक राहिला होता. या परिस्थितीमुळे संबंधित कंपन्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले.
यंदाही एचटीबीटी बियाण्यांचा प्रभाव राहण्याची शक्यता बाजारातील जाणकार व्यक्त करीत आहेत. एचटीबीटी लागवड क्षेत्रात व्यवस्थापनाचा खर्च तुलनेने खूपच कमी होतो. शिवाय तणनियंत्रण करणे सोपे राहते, असा सातत्याने दावा होत आहे. यामुळे शेतकरी या बियाण्यांना पसंती देऊ लागले आहेत. गावखेड्यात विशिष्ट नेटवर्कच्या माध्यमातून हे बियाणे शेतकऱ्यांपर्यंत थेट पोहोचवले जाते. या बियाणांना रोखण्यासाठी कृषी खात्याने या वेळी जिल्ह्यांना पथकेही नेमली आहेत. त्यांच्याकडून कितपत हे बियाणे रोखले जाते, हे येत्या काळात दिसून येईल.
दरम्यान, बीटी कापूस बियाणे उत्पादक कंपन्यांमध्ये आपल्या वाणांच्या विक्रीबाबत काहीशी चिंता पसरलेली दिसून येत आहे. मागील वर्षातील अनुभव पाहता यावेळी काळजीपूर्वक नियोजन करण्यात येत असल्याचे कंपन्यांच्या प्रतिनिधींकडून सांगण्यात येत आहे. एकूणच, यंदाचा खरीप हंगाम कपाशी लागवडीच्या दृष्टीने सकारात्मक दिसत असला तरी पाऊस कधी व किती पडतो यावरही कपाशीचे क्षेत्र ठरणार आहे. बाजारात शुक्रवारपासून (ता.१५) बीटी बियाणे विक्रीला सुरुवात होत असतानाच काही मोजक्या वाणांचा पुरवठा झालेला दिसून येत आहे. येत्या आठवड्यात पुरवठ्याला गती येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.