तेला-तुपाचे खायची सोयच नाही; महागाईबाबत दाम्पत्याने मांडली व्यथा

‘शंभर रुपयात दवाखाना होत होता, आता पाचशे जातात. दोन हजारांच्या किराणाला आता तीन हजार लागतात. वीजबिल तीन महिन्याला पाचशे यायचे, आता महिन्याला पाचशे येते.
Inflation
InflationSakal
Summary

‘शंभर रुपयात दवाखाना होत होता, आता पाचशे जातात. दोन हजारांच्या किराणाला आता तीन हजार लागतात. वीजबिल तीन महिन्याला पाचशे यायचे, आता महिन्याला पाचशे येते.

सोमेश्वरनगर - ‘शंभर रुपयात दवाखाना (Hospital) होत होता, आता पाचशे जातात. दोन हजारांच्या किराणाला (Grocery) आता तीन हजार लागतात. वीजबिल (Electricity Bill) तीन महिन्याला पाचशे यायचे, आता महिन्याला पाचशे येते. महागाईनं (Inflation) कुटुंब इतकं पोळतंय की दूध (Milk) आणि पुस्तक (Book) खरेदी बंद करावी लागली. मुलांसाठी तळण बनवून द्यायची सोय नाही, तिथे पर्यटन वगैरे दूरची गोष्ट आहे,’’ अशी शब्दांत असंघटित गरीब कुटुंबाच्या प्रातिनिधीक व्यथा करंजेपूल (ता. बारामती) येथील उषा साळवे व सुधीर साळवे यांनी व्यक्त केल्या.

साळवे कुटुंबाचा शिवणकाम हाच प्रमुख व्यवसाय आहे. सुधीर साळवे हे योगविषयक ज्ञान असल्याने सातारा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागासोबत अधूनमधून योगशिक्षणाच्याच कंत्राटी कामात असतात. मुलगा पार्थ अकरावीला, तर मुलगी सुज्ञा पाचवीच्या वर्गात आहे. साळवे यांना महिन्याला सहाशे रुपयांचे पेट्रोल लागत होते, आता आठशे खर्च होतात. दुचाकीचे सर्विसिंग तीन महिन्यांनी पाच-सहाशे रूपयांत व्हायचे, आता पंधराशे लागतात. सातारा आरोग्य विभागाकडे योगशिक्षणासाठी जा-ये करण्यासाठी लागणारा कधी एसटीचा कधी दुचाकीचा खर्च वेगळाच. मोबाईल रिचार्जही वाढलेत, पण त्याला पर्याय नाही. मुलांच्या ऑनलाइन शिक्षणावेळी मात्र साळवे कुटुंबास मुलांसाठी स्वतंत्र मोबाईल घेऊन स्वतंत्र रिचार्ज मारणे शक्य झाले नाही. चिकन किंवा मटण आठवडा-पंधरा दिवसातून एकदा असायचे, ते दीड-दोन महिन्यावर गेले आहे.

सुधीर साळवे म्हणाले, ‘आठवड्याला भाजीपाल्यासाठी पाचशे आणि महिन्याला किराणाला आता तीन हजार रुपये सहज लागतात. गॅस चार महिन्यात दोनशे रुपयांनी वाढल्याने महागाईत भर पडली आहे. वीजेचे बिल तीन महिन्याला तीन-चारशे रुपये यायचे. आता महिन्याला चार-पाचशे रुपये येते. तेलाचा एक लिटरचा पुडा दोनशे रुपयाला झाला आहे, तर तूप सहाशे रुपये किलोवर गेले आहे. मुलांना काही तेला-तुपात बनवून द्यायची सोय राहिली नाही.’’

हे व्हायला हवे

शिक्षण आणि आरोग्य या महत्त्वपूर्ण बाबी मोफत दिल्या तर संपूर्ण ताण कमी होईल. घरकुलासाठी सव्वा लाखऐवजी अडीच लाख मिळायला हवेत. औषधांच्या किमती पन्नास टक्क्यांपेक्षा कमी झाल्या पाहिजेत. घरगुती गॅसची किंमत पाचशे रुपयांपर्यंत हवी. तेल प्रतिकिलो शंभर रुपये हवे. वीजबिल शंभर रुपये महिना व्हायला हवे.

काटकसरीचे उपाय...

  • विजेची बचत

  • दूध आवश्यक तेव्हाच घेतो

  • तेलाचा वापर कमी केला

  • अत्यावश्यक वस्तू घेणे लांबवले (उदा. कपडालत्ता)

  • हॉटेलिंग, पर्यटन बंद केले. वाचनाची पुस्तकखरेदी बंद केली

साधा ताप-खोकला असला तर शंभरात बरे व्हायचो. आता डॉक्टरच सुई मारून शंभर घेतात आणि मेडिकलला तीनशे रुपये पुरत नाहीत. मोठा आजार असेल, तर पन्नासेक हजार सहज जातात आणि कुटुंब दोन वर्षे मागे येतं. शिक्षण सरकारी असल्याने फी कमी राहते, परंतु तीसची वही साठला आणि दहाचा पेन तीसला झाला आहे. पुस्तकांसोबत कपडालत्ता, बूट याच्याही किमती महागल्या आहेत. त्यामुळे मुलांना बाहेरगावी शिकायला पाठवण्याचे धाडस करणे अवघड होणार आहे.

- उषा साळवे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com