अकार्यक्षमतेमुळे जिल्हा रुग्णालयाचे शवागार ‘मृत्यूशय्येवर’

अकार्यक्षमतेमुळे जिल्हा रुग्णालयाचे शवागार ‘मृत्यूशय्येवर’

Published on

जिल्हा रुग्णालय ‘व्हेंटिलेटरवर’

विजय गायकवाड ः सकाळ वृत्तसेवा

पिंपळे गुरव, ता. ३ ः नवी सांगवी येथील जिल्हा रुग्णालयात मृतदेह सुरक्षित ठेवण्यासाठी शवागारात उपलब्ध असलेल्या सर्व सहाही शीतपेट्या बंद अवस्थेत असल्याने रुग्णालय प्रशासनासह मृतांच्या नातेवाईकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे एखादा मृत्यू झाल्यास मृतदेह ठेवायचा तरी कुठे, असा गंभीर आणि संवेदनशील प्रश्न निर्माण झाला आहे.
पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठे आणि महत्त्वाचे रुग्णालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी शहरी आणि ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने रुग्ण दाखल होत असतात. अपघात, गंभीर आजार किंवा अन्य कारणांमुळे मृत्यू झाल्यास मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देईपर्यंत शीतपेटीत ठेवणे अत्यावश्यक असते. मात्र शवागारात सध्या ही मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने मृताच्या नातेवाईकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. या गंभीर परिस्थितीमुळे जिल्हा रुग्णालयाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आरोग्य विभाग व संबंधित प्रशासनाने तातडीने याची दखल घेऊन बंद असलेल्या शीतपेट्या दुरुस्त कराव्यात, आवश्यक गॅसची उपलब्धता करून द्यावी तसेच भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी नागरिक व सामाजिक संस्थांकडून होत आहे.


गॅसचा अभाव
जिल्हा रुग्णालयातील शवागारात एकूण सहा शीतपेट्या उपलब्ध आहेत. त्यापैकी चार शीतपेट्या जिल्हा रुग्णालयाच्या मालकीच्या असून दोन शीतपेट्या रोटरी क्लबकडून देण्यात आल्या आहेत. मात्र, गेल्या सुमारे एक वर्षापासून जिल्हा रुग्णालयाच्या चारही शीतपेट्या बंद अवस्थेत आहेत. या शीतपेट्या नादुरुस्त झाल्याने मृतदेह ठेवण्याची व्यवस्था पूर्णपणे कोलमडली होती. ही अडचण लक्षात घेऊन रोटरी क्लबने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून दोन शव शीतपेट्या उपलब्ध करून दिल्या. तथापि, दुर्दैवाने रोटरी क्लबने दिलेल्या या दोन शीतपेट्याही सुमारे महिनाभरापासून बंद आहेत. शीतपेट्यांमध्ये आवश्यक असलेला गॅस उपलब्ध नसल्यामुळे त्या कार्यरत राहू शकल्या नाहीत. परिणामी सध्या जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात एकही शीतपेटी कार्यरत नाही.


आरोग्याच्यादृष्टीनेही गंभीर
- रुग्णालयात रात्री ८ नंतर मृत्यू झाल्यास ठेवणार कुठे ?
- नातेवाइकांना मानसिक तणाव, प्रतीक्षेचा त्रास
- शवविच्छेदन व अंत्यसंस्कार प्रक्रियेत अनावश्यक विलंब
- आरोग्य, स्वच्छतेच्या दृष्टीने गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.


अंत्यसंस्कारात अडथळे
अनेकवेळा गंभीर आजारामुळे मृत्यू झाल्यानंतर नातेवाईक दूरवरून येईपर्यंत मृतदेह सुरक्षित ठेवणे आवश्यक असते; मात्र, शवागार बंद असल्याने ही व्यवस्था उपलब्ध होत नाही. परिणामी, नातेवाइकांना मानसिक तणाव, धावपळ व गैरसोय सहन करावी लागत आहे. अंत्यसंस्कार प्रक्रियेतही अडथळे निर्माण होत आहेत.


जिल्हा रुग्णालयात एकूण ६ शवागार शीतपेट्या उपलब्ध असून त्यापैकी ४ शीतपेट्या निकामी झालेल्या आहेत. उर्वरित २ शीतपेट्यांचे कॉम्प्रेसर नादुरुस्त असल्यामुळे त्या सध्या बंद अवस्थेत आहेत. या दोन्ही शीतपेट्या तातडीने दुरुस्त करून कार्यान्वित करण्यात येतील. तसेच नवीन शीतपेट्यांच्या खरेदीसाठी संबंधित प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात आलेला आहे.
- डॉ. नागनाथ यमपल्ले, शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय

जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात मृतदेह ठेवण्यासाठी एकूण ६ यांत्रिक शीतपेट्या उपलब्ध आहेत.
त्यापैकी ४ शीतपेट्या गेल्या वर्षभरापासून कायमस्वरूपी बंद आहेत. उर्वरित २ शीतपेट्यांवर जिल्हा रुग्णालयासह परिसरातील रुग्णालयांचीही भिस्त होती. मात्र, त्या देखील गेल्या महिनाभरापासून
बंद असल्याने गंभीर अडचणी निर्माण झाल्या आहेत. शवागाराच्या देखभाल व दुरुस्तीकडे रुग्णालय प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
- शरत शेट्टी, सामाजिक कार्यकर्ते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com