पुणे - 'समीक्षा अधिक सोपी करून लिहिली जात आहे. त्यातून लेखक मित्रावर स्तुतिसुमने उधळली जात आहेत. खर तर समीक्षा हा अत्यंत गंभीर आणि बौद्धिक व्यवहार आहे. यादृष्टीने समीक्षा व्यवहाराकडे पाहणारे लोक सध्या फारच कमी आहेत,'' अशी खंत साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी व्यक्त केली.
"मूल्यभानाची सामग्री' या ग्रंथाबद्दल महाराष्ट्र साहित्य परिषदेचा "रा. श्री. जोग पुरस्कार' समीक्षक हरिश्चंद्र थोरात यांना डॉ. कोत्तापल्ले यांच्या हस्ते बुधवारी प्रदान करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. प्रकाशक येशू पाटील, परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोशाध्यक्ष सुनीताराजे पवार आदी उपस्थित होते.
कोत्तापल्ले म्हणाले, 'लेखक लिहितो, भूमिका मांडतो तेव्हा तो राजकारणच करत असतो. त्याचा त्रास ज्ञानेश्वरांना झाला. आजच्या काळात दाभोलकरांनाही झाला. जातीचा प्रश्न अधिक गंभीर होत असून, राजकारणाचे स्वरूप बदलत चालले आहे. देशीवाद लेखकांनाच आवडू लागला आहे. अशा विषयांवर लिहिले गेले पाहिजे.''
थोरात म्हणाले, 'मी आजही मराठीचा विद्यार्थी आहे. त्यामुळे "रा. श्री. जोग' हे नाव किती मोठे आहे, याची पूर्ण जाणीव आहे. त्यांच्या नावाचा पुरस्कार मिळणे ही आनंदाची घटना आहे.'' बंडा जोशी यांनी सूत्रसंचालन केले.
मराठी भाषा दिन आला की सरकार वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करून भाषेचा गौरव करू पाहते; पण दुसरीकडे हेच सरकार मराठी शाळा कशा मरतील, याचा कार्यक्रम राबवत आहे. सरकार कुठलेही असो, याचा विचार झाला पाहिजे.
- डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, साहित्यिक
|