गोधन शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासाचे माध्यम - अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार : पुण्यात ‘गोधन-२०२२’ प्रदर्शन आणि प्रात्यक्षिकांचे उद्‌घाटन
economic development of Godhan 2022 farmers Ajit Pawar pune
economic development of Godhan 2022 farmers Ajit Pawar punesakal

पुणे : स्वार्थासाठी गोवंशाचा मुद्दा राजकीय बनवू नये. उलट, गोधन हे शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासाचे उत्तम माध्यम आहे. त्यामुळे देशी गोवंशाचे संवर्धन केले पाहिजे. त्यासाठी राज्य सरकार निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.सकाळ-अॅग्रोवन व महात्मा फुले कृषी विद्यापीठाने संयुक्तपणे आयोजित केलेल्या ‘गोधन -२०२२’ प्रदर्शन व प्रात्यक्षिकांचे उद्घाटन करताना उपमुख्यमंत्री बोलत होते. व्यासपीठावर आ. अशोक पवार, आ. नरेंद्र दराडे, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील, ‘अॅग्रोवन’चे संपादक संचालक आदिनाथ चव्हाण, जिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख, पुणे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, गोवंश संशोधन केंद्राचे प्रमुख प्रा. डॉ. सोमनाथ माने व इतर शास्त्रज्ञ होते.

देशातील जातिवंत तसेच दुर्मिळ दुधाळ गोवंश एकाच ठिकाणी पाहण्याची संधी ‘गोधन’मुळे मिळते आहे. या प्रदर्शनाचे सहप्रायोजक ‘कन्हैया अॅग्रो’, ‘चितळे डेअरी’ व ‘बारामती अॅग्रो’ आहेत. उपमुख्यमंत्र्यांनी अत्यंत बारकाईने या प्रदर्शनाची पाहणी केली. तसेच, गोपालन व गोवंश संशोधनाविषयी विविध प्रश्न विचारत सूचनाही केल्या.पवार म्हणाले की, ‘‘गोवंशाचा मुद्दा हा राजकारणाचा ठरू नये. भारतीय जीवन पद्धतीत शेती ही गोधनाच्या मदतीने बहरली आहे. त्यामुळे शेतकरी गोवंशासाठी कृतज्ञ व हळवा असतो. आम्ही स्वतः शेतकरी कुटुंबातील असल्याने बारकावे माहीत आहेत. देशी गायीचे गोठे आम्ही सांभाळले, धारा काढल्या, चांगल्या देशी गायींसाठी आम्ही परराज्यात हिंडलो आहोत.

त्यामुळे आम्ही देशी गायींचे महत्त्व जाणतो. त्या जतन केल्या पाहिजे. राज्यात भौगोलिक स्थितीनुसार विविध गोवंश आहेत. त्याचे संवर्धन झाले पाहिजे. त्यासाठी कृषी विद्यापीठाच्या या ‘देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रा’चे नाव आदराने घेतले जाते. मात्र, येथील गोठ्यांमध्ये अजून सुधारणा करावी. आर्थिक मदतीकरिता राज्य सरकार तुमच्या पाठीशी असेल.’’ ‘अॅग्रोवन’चे संपादक संचालक आदिनाथ चव्हाण प्रास्ताविकात म्हणाले की, ‘‘गोवंश संवर्धन चळवळीत ‘सकाळ-अॅग्रोवन’ १५ वर्षांपासून काम करतो आहे. एटू-मिल्क तसेच सेंद्रिय शेतीतील पदार्थांना मागणी वाढते आहे. ही चळवळ आता एका निर्णायक टप्प्यावर आली आहे. मात्र, यात आता हवशे-गवशे -नवशे जमा होत असल्याने चळवळ बदनाम होते आहे. ती शुद्ध करण्यासाठी कृषी विद्यापीठे व शासनाला पुढाकार घ्यावा लागेल.’’

प्रदर्शनातील चर्चासत्रे

  • शनिवारी (ता. २८) ः सकाळी ११ वाजता राजस्थानमधील अभ्यासू पशुपालक संपत भार्गव यांचे अनुभवकथन. २) दुपारी तीन वाजता गुलाबराव यादव यांचे ‘गोपालन, गोमय वस्तूंचे उत्पादन’ या संबंधी अनुभवकथन.

  • रविवारी (ता. २९) ः सकाळी ११ वाजता शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने यांचे देशी गोवंशासाठी पोषणाचे तंत्रज्ञान या विषयांवर मार्गदर्शन.

  • दुपारी बारा वाजता डॉ. धीरज कणखरे यांचे ‘दुग्धप्रक्रिया तंत्र’ या विषयावर मार्गदर्शन.

  • दुपारी अडीच वाजता डॉ. नितीन मार्कंडेय यांचे ‘देशी गोवंशाची जातिवंत पैदास’ विषयावर व्याख्यान

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com