Bhama Askhed Dam : भामा आसखेडच्या पाण्याला कोणी वाली आहे का ? शेतकऱ्यांचा संतप्त सवाल

धरण उशाला आणि कोरड घशाला अशी अवस्था झाल्याची शेतकऱ्यांची परिस्थिती,२७ दिवसांत २६ टक्के पाणीसाठा कमी
Bhama Askhed Dam
Bhama Askhed Dam Sakal

आंबेठाण :खेड,शिरूर,दौंडसह पुणे शहराच्या पूर्व भागाला वरदान ठरलेल्या भामा आसखेड ( ता.खेड) धरणात आज ( दि.१५ ) अवघा २८.४१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागील २७ दिवसांपासून सुरू असलेल्या आवर्तनामुळे पाणीसाठा २.०२ टीएमसी म्हणजे २६ टक्केने कमी झाला आहे.

२७ दिवसांपासून सलग आवर्तन सुरू असल्याने पाणीसाठा झपाट्याने खाली जात आहे परिणामी धरणाच्या बुडीत क्षेत्रातील पाण्यावर अवलंबून असणारी गावे,शेती मात्र पाण्यासाठी व्याकुळ झालेली पहायला मिळत आहे.

मागील वर्षीच्या तुलनेत हा साठा जवळपास १७.६५ टक्केने कमी असून मागील वर्षी आजच्या तारखेला धरणात ४५.७९ टक्के पाणीसाठा शिल्लक होता.भामा आसखेड हे खेड तालुक्यातील पश्चिम भागात भामा नदीवर उभारलेले मातीचे धरण आहे. धरणाची पाणी साठवण क्षमता ८.१४ टीएमसी इतकी आहे. चालू वर्षी धरण परिसरात १ जून पासून ८७० मिमी पावसाची नोंद झाली आहे.

धरणात सध्या एकूण पाणीसाठा हा २.६५ टीएमसी असून उपयुक्त पाणीसाठा हा २.१७ टीएमसी इतका आहे. मागील वर्षी आजच्या तारखेला धरणात ४५.७९ टक्के पाणीसाठा होता. कालवा सल्लागार समितीच्या निर्णयानुसार दुष्काळजन्य परिस्थितीमुळे २० मार्च पासून आलेगाव पागापासून पुढे असणारे ७ बंधारे भरण्यासाठी हे पाणी सोडण्यात आले असून धरणाच्या आयसीपीओ मधून १००० क्यूसेस वेगाने हे पाणी सोडणे सुरू आहे. आलेगाव पागापर्यंत असणारे १८ बंधारे आणि पुढील ७ बंधारे या आवर्तनातून भरले जाणार आहे.

पुढील काळात पिंपरी चिंचवड शहराला भामा आसखेड धरणातून २.१४ टीएमसी पाणीसाठा देण्यात येणार आहे.अजून हे पाणी देणे सुरू झाले नसल्याने धरणात सध्या पाणीसाठा दिसत आहे परंतु हे पाणी देणे सुरू झाले तर सोडण्यात येणारी आवर्तने कमी होतील अशी शक्यता आहे.

आगामी कडक उन्हाळ्याची चाहूल आणि पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता पाणी जपून वापरावे असे आवाहन सहाय्यक अभियंता ( श्रेणी १ ) अश्विन पवार,शाखा अभियंता निलेश घारे-देशमुख,कालवा निरीक्षक वसंत ढोकरे यांनी केले आहे.

दिनेश मोहितेपाटील ( संचालक,संत तुकाराम सहकारी कारखाना,शेतकरी गोनवडी ) -

दौड तालुक्यातील भामा आसखेडच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनीवरील लाभार्थी म्हणून असणारे शिक्के काढले.तरीही त्यांना पाणी सुरू आहे आणि खेड तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या त्यांना पाणी मिळत नाही ही शोकांतिका आहे.

विनायक शिवेकर ( प्रकल्पग्रस्त शेतकरी, शिवे ) -

मागील २७ दिवसांपासून धरणातून पाणी सोडणे सुरू आहे. खेड तालुक्यातील एकही लोकप्रतिनिधी याबाबत बोलत नाही, या भागातील शेतकरी धरणासाठी जमिनी देऊनही अडचणीत आला असून सद्या तालुक्याचा पश्चिम भाग तहानलेला आहे.

रोहिदास गडदे ( माजी पंचायत समिती सदस्य ) -

सर्वच लोकप्रतिनिधी यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले असून तालुक्यातील पश्चिम भागात जनावरांना पिण्यासाठी की चाऱ्यासाठी पाणी मिळत नाही ही शोकांतिका आहे. दौडची लोक राजकीय दबाव टाकून पाणी घेतात पण आमच्या भागाचे प्रतिनिधित्व करणारे आजी-माजी खासदार,आमदार,भाजप जिल्हाध्यक्ष यांना आमच्या भागाचे काही पडले नाही असे दिसत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com